जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तीन वेळा शेतजमीन मोजूनही न्याय न मिळाल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने आज महाराष्ट्र दिनी जामनेर भूमी अभिलेख कार्यालयासमोर पेट्रोल टाकून जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.
बाबुराव पाटील, असे या शेतकऱ्याचे नाव असून ते खर्चाणे गावचे रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांच्या शेताची तीन वेळा मोजणी झाली, परंतु त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. यामुळे निराश होऊन त्यांनी आज भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसमोर अंगावर पेट्रोल टाकून हा प्रयत्न केला आहे.
घडलेल्या प्रकारानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली असून, बाबुराव पाटील यांच्या शेताची पुन्हा मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही मोजणी ९ मे रोजी करण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आता तरी या शेतकऱ्याला न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वारंवार मोजणी होऊनही शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.