चुंचाळे ग्रामपंचायतीत कोट्यवधी निधीचा घोटाळा?, चौकशीसाठी महिलांचे आमरण उपोषण

यावल लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।यावल तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायत कार्यालयात विकास कामांसाठी आलेल्या शासकीय निधींचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर व घोटाळा करण्यात आला आहे, यात घरकुल, गावठाण जागा, २ वर्षात एकही ग्रामसभा नाही, सर्रास दारूची विक्री यांचा समावेश आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्राजक्ता तायडे आणि सुजाता ठाकूर यांनी जळगाव जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. या दोन महिलांनी केलेल्या आरोपानुसार, ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या निधीचा परस्पर वापर करण्यात आला असून अनेक गंभीर अनियमितता समोर आल्या आहेत.

महिला उपोषणकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, गावात अनेक घरकुले अस्तित्वात नसताना देखील त्यांच्या नावावर निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच, ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव मंजूर असतानाही गावात सर्रासपणे दारू विक्री सुरू आहे. गेल्या दोन वर्षात एकही ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. याव्यतिरिक्त, गावठाणच्या जागा सरपंच आणि सदस्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे.

उपोषणकर्त्या महिलांनी प्रोसिडिंग बुकमध्ये छेडछाड केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. गावातील विकासकामांमध्येही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पेव्हर ब्लॉक, गटारी, वॉल कंपाऊंड आणि शाळेची भिंत यांसारखी अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असताना शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आला आहे, असा आरोप महिलांनी केला आहे.

या संपूर्ण गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्राजक्ता तायडे आणि सुजाता ठाकूर यांनी केली आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आपले आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून यावर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content