मराठा समाजाबाबत काँग्रेसची भूमिका नेहमी कपटीच – चंद्रकांत पाटील

मुंबई । काँग्रेस पक्षाने ना कधी मराठा समाजाच्या हिताचा विचार केला आहे आणि ना समाजासाठी काही चांगली गोष्ट केली आहे. मराठा समाजाबाबत काँग्रेसची भूमिका नेहमी कपटीच राहिली आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कर्नाटकमधील भाजप सरकारने तेथील मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी महामंडळाची घोषणा करत असताना पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र, यावरुन टीका केली आहे. त्यांच्या याच टीकेबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक आणि ट्विटरवर एक पोस्ट लिहून ही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये राहणाऱ्या मराठा बांधवांच्या हितार्थ त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी एका महामंडळाची घोषणा केली असून त्यांच्यासाठी 50 कोटी रुपये केवळ जाहीर केले नाहीत तर त्यांचे वाटपदेखील केले आहे.

आज काँग्रेस पक्षाचे असलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते सिद्धरामैया यांनी येडीयुरप्पा यांच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. सिद्धरामैया म्हणाले की, कन्नड आणि मराठी लोकांमध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरु असल्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांसाठी केलेले कोणतेही काम योग्य ठरणार नाही. सिद्धरामैया यांच्या मते, यामुळे कन्नड लोकांच्या भावना दुखावल्या जातील.

सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातदेखील काँग्रेसचा मराठ्यांबद्दल असाच स्वभाव पाहायला मिळाला आहे. आधी सरकारने काही न काही घोळ करून आरक्षणात अडचणी निर्माण केल्या, त्यानंतर सारथीला नुकसान पोहोचवून अण्णासाहेब पाटील महामंडळसुद्धा बरखास्त करून टाकले. काँग्रेस पक्ष भले ही महाराष्ट्राचा असो किंवा कर्नाटकचा, दिल्लीचा असो वा इटलीचा… सर्वच भारत आणि भारतीयांच्या विकासाचे शत्रू आहेत, अशी घणाघाती टीका पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेता सिद्धरामैया यांच्या या वक्तव्याबद्दल अगदी चिडीचूप मुक्या-बहिऱ्यासारखे पाहत राहतील. यांनी ना कधी मराठा समाजाच्या हिताचा विचार केला आहे आणि ना मराठा समाजासाठी काही चांगली गोष्ट केली आहे. सत्तेची लाचारी… काँग्रेस विचारांनीसुद्धा भ्रष्टाचारी ! असा टोला देखील त्यांनी काँग्रेसपक्षाला लगावला आहे.

 

Protected Content