मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपला शपथनामा अर्थात जाहीरनामा आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यात शेतकरी, शिक्षण, रोजगार, आणि आरोग्य अशा ठळक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा या शपथनाम्यात अंतर्भाव करत बेरोजगार तरुणांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासनही काँग्रेस आघाडीने दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत जाहीरनामा सादर केला. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास आणि शाश्वत विकासाच्या दिशेने जाण्याचा निर्धार करणाऱ्या ‘१७ शाश्वत विकास उद्दिष्टांच्या’ अंमलबजावणीसाठी कॉंग्रेस आघाडी वचनबद्ध आहे, असे यावेळी दोन्ही नेत्यांनी सांगितले.