धुळे प्रतिनिधी | ड्रग्ज प्रकरणी वादात सापडलेला सुनील पाटील हा राष्ट्रवादीशी नव्हे तर भाजपशी संबंधीत असून त्याचे पाटील हे आडनावही खोटे असल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
सुनील पाटील हा राष्ट्रवादीशी संबंधीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर राष्ट्रवादीने याचा इन्कार केला आहे. खुद्द सुनील पाटील यानेही याचा इन्कार केला आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी सुनील पाटीलबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अनिल गोटे म्हणाले की, सुनील पाटील हा राष्ट्रवादीशी संबंधीत नाही. त्याने २०१२-१३ मध्ये त्यांनी दहीहंडीचं आयोजन केलं होतं. त्या दहीहंडीला ११ लाखांचे बक्षीस लावले होते. त्यापूर्वी कोणीच एवढं बक्षीस लावलं नव्हतं. ही दहीहंडी ऍरेंज करणारे सर्व लोक भाजपचे होते. आजही आहेत. आमचा काय संबंध त्यांच्याशी? सुनील पाटीलचे धुळ्यातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंध आहेत. या प्रकरणात चारही बाजूने भाजप अडचणीत आली आहे. त्यामुळे कुणावर तरी ढकलायचं म्हणून ते आमचं नाव घेत आहेत, असा आरोप अनिल गोटे यांनी केला.
अनिल गोटे पुढे म्हणाले की, सुनील पाटील यांचं खरं आडनाव पाटील नाही. त्यांचं खरं आडनाव चौधरी आहे. दरम्यान, शिरपूरला टनाने गांजा होता. १५०० एकर शेतीत गांजा लावला होता. त्यात ५०० एकर जमीन ही वनखात्याची होती. याच समीर वानखेडेंकडे त्याची मी तक्रार केली होती. लेखी तक्रार केली होती. दोन वेळा बोललोही त्यांच्याशी. तेव्हा वानखेडे इथे का आले नाही? कारण इथे सेलिब्रिटी नव्हती ना? पब्लिसिटी मिळाली असती, पण इतकी मोठी मिळाली नसती म्हणून वानखेडे आले नाहीत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.