जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गाव पातळीवर ग्रामसेवक, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे जळगाव जिल्ह्याने घरकुल मंजुरी आणि बांधकामे पूर्ण करण्याच्या कामात मोठी आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी हे गौरवोद्गार काढले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, मुख्य लेख व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती करनवाल म्हणाल्या की, पंचायत राज व्यवस्थेचा मूळ उद्देश गाव पातळीवर ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाच्या विकासाचा विचार करणे हा आहे आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक गावे या दिशेने सक्रियपणे काम करत आहेत. त्यांनी हागणदारी मुक्ती, सुंदर गाव योजना आणि घरकुल योजना यांसारख्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले.
त्यांनी पुढे सांगितले की, जिल्ह्यात सुरू असलेली घरकुलांची बांधकामे कोणत्याही परिस्थितीत पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी उद्दिष्ट निश्चित करून काम करावे. घरकुलांच्या कामाची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी जळगाव जिल्हा परिषद लवकरच एक स्वतंत्र ॲप विकसित करत आहे. या ॲपमुळे बांधकामाची नेमकी स्थिती कळेल आणि हप्ते वितरित करणे सोपे जाईल. त्यामुळे सर्व गावांनी पावसाळ्यापूर्वी बांधकामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.