बारावीचा निकाल जाहीर! राज्यात ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण अव्वल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा बहुप्रतिक्षित निकाल आज, ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. राज्यभरातील तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यंदा राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात १.४९ टक्क्यांची किंचित घट झाली आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या निकालामध्ये नेहमीप्रमाणे कोकण विभागाने सर्वाधिक उत्तीर्णतेची नोंद केली आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के इतका आहे. तर, सर्वात कमी निकाल लातूर विभागाने नोंदवला असून, तो ८९.४६ टक्के आहे. मागील वर्षी, २०२४ मध्येही कोकण विभागाने ९७.५१ टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले होते, तर मुंबई विभागात सर्वात कमी ९१.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

नऊ विभागीय मंडळांच्या निकालाची सरासरी खालीलप्रमाणे आहे:
कोकण – ९६.७४ टक्के, कोल्हापूर – ९३.६४ टक्के, मुंबई – ९२.९३ टक्के, संभाजीनगर – ९२.२४ टक्के, अमरावती – ९१.४३ टक्के, पुणे – ९१.३२ टक्के, नाशिक – ९१.३१ टक्के, नागपूर – ९०.५२ टक्के, लातूर – ८९.४६ टक्के याप्रकरणे लागला आहे.

या निकालामध्ये नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळांमधील मुलींच्या उत्तीर्णतेची सरासरी ९४.५८ टक्के आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची सरासरी ८९.५१ टक्के इतकी आहे. म्हणजेच, मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा लक्षणीयरीत्या ५.०७ टक्क्यांनी अधिक आहे. बारावीच्या परीक्षेत एकूण १५४ विषयांचा समावेश होता, आणि विशेष बाब म्हणजे यापैकी ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याव्यतिरिक्त, शासन निर्णयानुसार खेळाडू, एनसीसी आणि स्काऊट गाईडमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यात आले आहेत, ज्याचा फायदा त्यांना निकालात झाला आहे.

Protected Content