निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाकडून झटका

images

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात प्रचाराचा धडाका लावलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याबाबतचा खटला चालवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज (दि.१) दिले आहेत. मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्र्यांविरोधातील या तक्रारीबाबत दिलासा दिला होता. त्यामुळे अॅड.सतीश उके यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा खटला चालवण्याचे निर्देश दिले आहेत.

 

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी आपला निकाल २३ जुलैला राखून ठेवला होता. २०१४ मध्ये फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपविल्याचे अॅड. उके यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. हे दोन्ही गुन्हे नागपूरमधील असून त्यातील एक गुन्हा मानहानीचा आणि दुसरा गुन्हा फसवणुकीचा असल्याचे म्हटले आहे. फडणवीस यांनी दोन्ही गुन्हे लपवून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावाही उके यांनी केला होता. शिवाय त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणीही केली होती. दरम्यान, अॅड. उके यांची याचिका दाखल करून घ्यायची की नाही ? याची विचारणा करणारी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांना काही महिन्यांपूर्वी पाठवली होती. याच प्रकरणात उच्च न्यायालयाने फडणवीस यांना आधीच दिलासा दिलेला होता.

Protected Content