भुसावळ, प्रतिनिधी | नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील प्रमुख रस्त्यासह गल्लीबोळातील रस्त्याचे ही तीन तेरा वाजले आहेत. यातच काल रात्री मुख्य बाजारपेठेतील रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने भुसावळकरांना रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. यामुळे शहरवासीयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रत्येक रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहे. त्यात काल रात्री बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर कोणीतरी लांबपर्यंत चारी खोदून ठेवली आहे. या चारीचा नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही चारी कोणी केली ? त्याने नगरपालिकेकडून परवानगी घेतली आहे का ? याची चौकशी केली जाईल. परवानगी घेतलेली नसल्यास संबधितांनवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा नगरसेवक युवराज लोणारी यांनी दिला आहे.