ब्रेकींग : भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील महामार्गावरील काहुरखेडा फाट्याजवळ भरधाव वेगाने येणारी दुचाकी पुलाच्या भिंतीवर आदळल्याने अल्पवयीन मुलगा जागीच ठार झाला तर सोबत असलेला तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुरज रामदास तांबे (वय-१५, रा. काहुरखेडा ता. भुसावळ ) आणि सुनिल विठ्ठल भालेराव (वय-२०, रा. वघारी ता. जामनेर) असे दोघे मृत तरूणांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरज तांबे आणि सुनिल भालेराव हे दोघे मित्र सोमवारी १६ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच १९ डी १६००) ने भुसावळ तालुक्यातील काहुरखेडा फाट्याजवळून भरधाव दुचाकीने जात होते. त्यावेळी स्पीडब्रेकरवरून वाहन आदळल्याने दुचाकीस्वार सुनिल भालेराव याचे दुचाकीवरील ताबा सुटल्यानंतर भरधाव दुचाकी थेट नजीकच्या पुलावरील भिंतीवर आदळली. या अपघातात सुरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाला. तर सुनिल भालेराव याला उपचारासाठी नेत असतांना त्यांचाही जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत बोहार्डीचे पोलीस पाटील साहेबराव शांताराम पाटील यांच्या खबरीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पो.कॉ. विजय बाविस्कर करीत आहे.

Protected Content