भाजपचे आंदोलन फक्त राजकारणासाठी ; वंचितची टीका

पंढरपूर, वृत्तसंस्था । वंचित बहुजन आघाडीला राज्यातील वारकरी संप्रदायाचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून आज भाजप कडून घंटानाद आंदोलन केले गेले असून त्यांचे आंदोलन केवळ राजकारणासाठी असल्याची खरमरीत टीका वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी केली. विठ्ठल मंदिर खुले करण्यासाठी आंदोलनादिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर प्रथम चंद्रभागा व पुंडलिकाचे दर्शन घेतील व नंतर वारकऱ्यांसमवेत विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील, असे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर चर्चेचे केवळ गाजर दाखवले मात्र कोणतीही चर्चा घडवून आणली नाही, असा आरोप चंदनशिवे यांनी केला. वारकरी परंपरांचे पालन करीत मंदिर प्रवेश होणार असून राज्यातल्या २०० पेक्षा जास्त संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिल्याचा दावाही त्यांनी केला. वंचितला राज्यातील वारकरी संप्रदायाचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून आज भाजप कडून घंटानाद आंदोलन केले जात असल्याचे ते म्हणाले.

भाजपचे ‘दार उघड’ आंदोलन मंदिरासाठी नाही सत्तेसाठी आहे. सत्तेचे दार उघडण्यासाठी हे सारे खटाटोप आहेत. प्रकाश आंबेडकर यांना राज्यभरातून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे भाजपने आंदोलनाचा फार्स केला आहे, असेही चंदनशिवे म्हणाले.

लॉकडाऊनमुळे पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी मंदिरे व अन्य धार्मिक स्थळांची दारे मात्र अद्याप बंदच आहेत.

Protected Content