नवी दिल्ली-वृत्तसेवा । पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांमधून भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळतांना दिसून येत असून हा पक्ष आसाम, पश्चीम बंगाल व पुदुचेरीत सत्तेवर येण्याचे संकेत असून केरळमध्ये काँग्रेस प्रणीत आघाडी तर तामीळनाडूत त्रिशंकू स्थितीत थलापती विजय हे किंगमेकर बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अलीकडेच आसाम, पश्चीम बंगाल, तामीळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या पाच राज्यांमधील निवडणुका पार पडल्या होत्या. आज सकाळपासून याची मतमोजणी सुरू झाली असून यात भाजपला मोठे यश लाभल्याचे दिसून येत आहे. आसाममध्ये भाजपला तब्बल 97 जागांवर आघाडी मिळाली असून काँग्रेसला २७ जागांवर आघाडी मिळाली आहे. यामुळे येथे भारतीय जनता पक्ष लागोपाठ तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चीम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये यंदा जंगी लढत झाली असून आज मतमोजणीतून याचे प्रतिबिंब उमटले आहे. आज सकाळी साडेदहा वाजेपर्यंत भाजपला तब्बल १६१ जागांवर आघाडी मिळाली असून तृणमुलचे उमेदवार १२१ जागांवर आघाडीवर आहेत. यामुळे येथे शेवटच्या टप्प्यात मोठा उलटफेर झाला नाही तर भाजप सत्तारूढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तामिळनाडू या महत्वाच्या राज्यातील निकाल हे सर्व राजकीय निरिक्षकांना चुकवणारे ठरले आहेत. प्रख्यात अभिनेता थलापती विजय याच्या टिव्हीके या पक्षाने सर्व अंदाज धुळीस मिळवत सर्वात मोठा पक्ष बनण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्या पक्षाला तब्बल १०३ जागांवर आघाडी मिळाली असून एआयएडीएमके आणि भाजप आघाडीला ७८ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर सत्तारूढ डीएमके पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाऊन त्यांना अवघ्या ५० जागा मिळाल्या आहेत. यामुळे येथे थलापती विजय यांचा पक्ष सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
केरळमध्ये डावी आघाडी आणि काँग्रेसच्या आघाडीत जोरदार लढत झाली होती. यात काँग्रेस आघाडीला चांगले यश मिळून त्यांचे उमेदवार तब्बल ९२ जागांवर आघाडी घेऊन आहेत. डाव्या आघाडीला ४६ तर भाजपला दोन जागांवर आघाडी मिळाली आहे. यामुळे येथे काँग्रेसचा मुख्यमंत्री बनणार आहे. तर पुदुचेरी येथे भाजपने तीसपैकी बावीस जागा मिळवत बहुमत प्राप्त केले असून काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत.



