दक्षिण भारतात भाजपला मोठा फटका,काँग्रेसच्या जागांमध्ये चारपट वाढ ; टाइम्स नाऊचा सर्व्हे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  न्यूज चॅनल टाइम्स नाऊने व्हीएमआरबरोबर मिळून केलेल्या सर्व्हेक्षणानुसार दक्षिण भारतात भाजपला मोठा फटका बसणार आहे तर काँग्रेसच्या जागांमध्ये चारपट वाढ होणार आहे. दक्षिण भारतातल्या 131 लोकसभेच्या जागांपैकी भाजपाला फक्त 17 जागा मिळतील, अशी शक्यता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरने व्यक्त केली आहे.

जानेवारीमध्येच हा सर्व्हे करण्यात आला असून, या सर्वेक्षणातून वेगवेगळ्या राज्यांतील निकालासंदर्भात अंदाज वर्तवण्यात आले आहेत. केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा आहेत. जर आता निवडणुका झाल्यास भाजपाचे खाते उघडू शकते. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ 16 जागांवर विजय मिळवेल. कम्युनिस्टांना तीन जागा राखण्यात यश येईल. 2014च्या लोकसभा निवडणुकीत यूडीएफने 12 जागा जिंकल्या होत्या. एलडीएफने 8 जागांवर विजय मिळवला होता. आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. जर आज निवडणूक लागल्यास वायएसआर काँग्रेस 23 जागांवर विजय मिळवेल. तेलुगू देसम पार्टी फक्त 2 जागा जिंकेल. इथे भाजपा आणि काँग्रेसला खाते उघडणेही अवघड आहे. 2014च्या निवडणुकीत टीडीपीने 15 जागा जिंकल्या होत्या. तर वायएसआर काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवला होता. भाजपाने 25 पैकी फक्त दोन जागा मिळवल्या होत्या. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत. तिथे आता निवडणुका झाल्यास काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला मोठा फायदा पोहोचू शकतो. यूपीए 39पैकी 35 जागांवर विजय मिळवेल, अशीही शक्यता व्यक्त केली आहे. तर एआयएडीएमके चार जागांवर विजय मिळवेल, असे चित्र आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला इथे खातेही उघडता येणार नाही. 2014च्या लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने 37 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांना खातेही उघडता आले नव्हते. भाजपा युती आणि इतरांच्या खात्यात 1-1 जागा गेली होती.

Add Comment

Protected Content