मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून केंद्र आणि राज्यात पुन्हा एकदा मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. निवडणुका संपल्यानंतरही भाजपमध्ये नेतेमंडळींचे इनकमिंग सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आता शेतकरी कामगार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांचे बंधू आणि माजी आमदार पंडीत पाटील यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाची घोषणा भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली. विशेष म्हणजे शेकापच्या नेत्या व माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटीलही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
पक्षप्रवेशानंतर बोलताना पंडीत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत आपल्या भूमिकेची मांडणी केली. ते म्हणाले, “मला भांडणं करायची गरज नाही. जिल्हा बँक संचालक, जिल्हा परिषद सदस्य, सगळेच आज इथे आले आहेत. माझं भाजपमध्ये येणं पूर्वी अशक्य वाटत होतं, पण धारप साहेब आणि चव्हाण साहेब यांना दिलेला शब्द मी पाळला.” ते पुढे म्हणाले, “शेकापच्या माध्यमातून आम्ही अनेकांना वर नेलं, आमच्या शिडीने लोक वर गेले पण आमचा कार्यकर्ता मात्र संपला. आम्ही सुनील तटकरे यांना खासदार केलं, पण त्यांनी आम्हाला विसरून टाकलं.”
पंडीत पाटील यांनी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचं विशेष कौतुक करताना सांगितलं की, “त्यांनी मला आश्वासन दिलं की, तुमच्या ज्ञानाचा उपयोग भाजपमध्ये होईल. मी शब्द देतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरेल.” या प्रवेशामुळे कोकणासह राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सध्या विराम मिळाला असला तरी त्यांच्या कुटुंबातील सदस्य भाजपमध्ये दाखल होत असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.