नाथाभाऊंच्या जावयाच्या अटकेला वर्ष पूर्ण : समर्थकांना जामीनाची आस !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना भोसरी येथील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अटक केल्यास आज बरोबर एक वर्ष झाले आहे. या प्रकरणात स्वत: नाथाभाऊ आणि त्यांच्या सौभाग्यवतींना दिलासा मिळाला असतांना गिरीश चौधरी अद्यापही अटकेतच आहेत. त्यांना लवकर जामीन मिळावा ही खडसे समर्थकांची आस लागली असून या प्रकरणातील पुढील तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने ७ जुलै २०२१ रोजी प्रदीर्घ चौकशीनंतर अटक केली होती. याच प्रकरणात आधीच म्हणजे जानेवारी २०२१ मध्ये स्वत: एकनाथराव खडसे हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले होते. यानंतर त्यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांची देखील चौकशी झाली होती. या प्रकरणात खडसे दाम्पत्य हे सध्या जामीनावर आहेत. मध्यंतरी ईडीने खडसे यांच्या दहा मालमत्ता खाली करण्याची नोटीस बजावली होती. याच्या विरोधात त्यांनी दिल्लीच्या हायकोर्टात धाव घेतली असता न्यायालयाने ईडीच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. हा एकनाथराव खडसे यांना मोठा दिलासा मानला गेला होता. तथापि, आज त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांच्या अटकेला एक वर्ष पूर्ण झाले असतांनाही त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यांचा जामीन अर्ज दोनदा फेटाळण्यात आलेला आहे.

न्यायालयाने १३ जून २०२२ रोजी गिरीश चौधरी यांना केईएम रूग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली होती. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले होते. ते वृत्त आपण या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात. यानुसार गिरीश चौधरी यांच्यावर केईएममध्ये उपचार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे वकील मोहन टेकावडे यांनी दिली होती.

एकनाथराव खडसे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतरचा कालखंड खूप खडतर गेला. अलीकडेच त्यांचे विधानपरिषदेवर राजकीय पुनर्वसन झाले असले तरी राज्यात अचानक सत्तांतर झाल्यामुळे त्यांचे मंत्रीपदाचे स्वप्न भंग पावले आहे. तर दुसरीकडे एक वर्ष होऊन देखील जावई गिरीश दयाराम चौधरी यांना जामीन न मिळाल्याने देखील नाथाभाऊंसह त्यांचे समर्थक चिंतेत आहेत. भोसरी भूखंड प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आले असून आता हा खटला न्यायालयात चालणार आहे. यामुळे गिरीश चौधरी यांना लवकरच जामीन मिळेल असा खडसे समर्थकांना विश्‍वास वाटत आहे. अर्थात, याबाबत कोर्टाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाणून घ्या भोसरी येथील भूखंड प्रकरण नेमके आहे तरी काय ?

भोसरी येथे सर्व्हे क्र. ५२ हिस्सा २ अ/२ या मिळकतीवरील २१ आर या जमिनीची मूळ मालकी अब्बास रसुलभाई उकानी (रा. कोलकता) यांच्या नावाने आहे. यामध्ये सलमा सौफुद्दीन वाना, बानुबेन फिरोजभाई पटेल, मुस्लिम फक्रुद्दीन उकानी, नफीसा लियाकत काथवाला, मारिया मुस्तफा लकडावाला, साकीना नजीमुद्दीन उकानी, इन्सीया मुर्तुझा बादलावाला व इतर वाटेकरी आहेत. सुमारे ४० वर्षांपूर्वी उकानी यांची जमीन एमआयडीसीने संपादित केली. ती परत मिळावी, म्हणून उकानी यांनी आठ सप्टेंबर २०१५ मध्ये हायकोर्टात याचिका केली. मात्र, हायकोर्टाने ती फेटाळून लावली होती. त्यानंतर उकानी यांनी ही ३.१ एकर जमीन तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची पत्नी व जावयाला विकली.

उकानी यांनी एमआयडीसीला या व्यवहाराची कोणतीही पूर्वकल्पना न देता याची खडसे यांची पत्नी व जावयाला विक्री केली होती. त्यांनी हा भूखंड तीन कोटी ७५ लाख रुपयांना विकला होता. दरम्यान, या भूखंडाची किंमत ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त असताना त्याचे बाजारमूल्य कमी दाखविण्यात आले. तर नव्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार या जमिनीचे मूल्य तब्बल ८० कोटी रुपये झाले आहे. यामुळे एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या कुटुंबियांना लाभ पोहचवला असा आरोप करण्यात आला.

या प्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी न्यायालयात धाव घेतली. यातील सुनावणीमध्ये खडसे यांनी रेडीरेकनर व स्टँप ड्युटी भरून ही जमीन खरेदी केल्याचे स्पष्टीकरण केले होते. एमआयडीसीने ही जागा ४० वर्षे होऊनही अधिग्रहीत केली नसून आमच्या कुटुंबाने पूर्णपणे वैध असा व्यवहार केला असून यात काहीही गैर नसल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही जमीन एमआयडीसीची असल्याचे सांगून त्यांच्या अडचणीत वाढ केली होती. यामुळे हा मंत्रीपदाचा गैरवापर असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे.

दरम्यान, एकनाथराव खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने याची चौकशी सुरू केली होती. यातून खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. खुद्द एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाताई खडसे यांची ईडीने चौकशी केली आहे. ईडीने या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात खडसे दाम्पत्यासह त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले असून याची न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Protected Content