महासभेत गाजला बालवाडीचा प्रश्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभेत ८ प्रशासकीय प्रस्ताव तर ११ अशासकीय प्रस्ताव अशा १९ प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. यात एक प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला. यावेळी महापालिकेच्या बालवाडीच्या दुरवस्थाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

 

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. या महासभेत ॲड. शुचिता हाडा यांनी तुकाराम वाडीतील महापालिकेच्या बालवाडीस छत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले असता यावर नियंत्रण ठाण्याकरिता तीन सदस्यीय समिती गठीत करण्यासाठी मागणी नितीन लढ्ढा यांनी केली. यावेळी ॲड. शुचिता हाडा यांनी यांनी शहरातील काही भागांमध्ये दिवसा देखील पथदिवे सुरु असतात, अशी तक्रार केली. तर याला अनुसरुन नगरसेवक नितीन लढ्ढा म्हणाले की, एकी कडे दिवसा देखील पथदिवे सुरु असता तर, दुसरीकडे वाढीव भागांध्ये अद्यापपर्यंत पथदिवेच लावण्यात आलेले नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच लवकरात लवकर वाढीव भागात पथदिवे बसविण्याची सुचना केली आहे. विशाल त्रिपाठी यांनी दलित वस्ती व ठक्कर बाप्पा योजनेचा निधी शहरातील पाचही दलित वस्तीच्या प्रभागामध्ये समान वाटप करण्यात यावा,अशी सुचना मांडली. त्याचप्रमाणे मनपा फंडातून काम करण्यास मक्तेदार तयार असतांना देखील आयुक्तांकडून मान्यता दिली जात नसल्याची खंत नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी व्यक्त केली. सभेच्या सुरुवातीला नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मनपा कर्मचाऱ्यांना शासनाच्या सुचनेप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा,अशी सुचना मांडली. तर, गेल्या वीस वर्षापासून विना वेतन पाणी पुरवठ्याचे काम करणाऱ्या ५ कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावर घ्यावे, असे मत उज्वला बेंडाळे यांनी मांडले.

Protected Content