समस्या सोडवण्यावर राहणार भर-आ. किशोर पाटील

भडगाव प्रतिनिधी । ‘आमदार आपल्या गावी’ या उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला असून आगामी काळात सर्व समस्या सोडविण्यावर आपला भर असेल. आणि हा उपक्रम शहरात सुरु करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.

या पत्रकार परिषेदते आमदार पाटील म्हणले की, गेल्या महिनाभरात संपूर्ण तालुक्यात पोहाेचलो. लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. समस्यांचे वर्गीकरण करून त्या-त्या विभागाकडे पाठवण्यात येतील. शेत रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे एक लाखाऐवजी तीन लाखांचा निधी मंजूर करण्याचा प्रयत्न आहे. भडगाव तालुक्यात खालावलेली जलपातळी वाढवण्यासाठी जलसंधारणाची कामांचे नियोजन आहे. दिव्यांगांना विविध साहित्यासाठी दहा लाखांचा निधी देणार आहे. लोकांच्या कामाच्या अनेक अपेक्षा असल्याचे त्यांच्या निवेदनांद्वारे समजले. त्या समस्या या तीन वर्षांच्या कार्यकाळात शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

तसेच यापुढे ग्रामीण भागाप्रमाणे शहरात ‘आमदार आपल्या प्रभागात’ हा उपक्रम हाती घेण्यात येऊन समस्या सोडवण्यावर भर असेल. दुसरा टप्पा पाचोरा तालुक्यात सुरू करण्यात येईल. त्यानंतर भडगाव व पाचोरा शहरांचा दौरा करणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. यावेळी सभापती डॉ.अर्चना पाटील, संजय पाटील, पं.स. सदस्य रामकृष्ण पाटील, बीडीअाे आर.एम.वाघ, कृउबा प्रशासक युवराज पाटील, डाॅ.प्रमोद पाटील, डाॅ.विशाल पाटील, प्रवीण ब्राह्मणे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील,भय्या पाटील, जे.के.पाटील उपस्थित होते.

Protected Content