भडगावसह परिसरात भरारी पथकांच्या तपासण्या

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमिवर भडगावसह परिसरात भरारी पथकांनी तपासण्या सुरू केल्या आहेत.

भडगाव तालुक्यात १ जून पासून बियाणे विक्री सुरू झाली असून शेतकर्‍यांची देखील बियाणे खरेदीची लगबग सुरू केलेली आहे. शेतकर्‍यांना दर्जेदार व वाजवी दरात बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने भडगाव शहरात व कजगाव परिसरात अचानक भरारी पथकाद्वारे कृषी केंद्रांच्या तपासणी सुरु करण्यात आलेल्या आहेत.
तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये ईश्वर देशमुख कृषी अधिकारी, पंचायत समिती भडगाव, आर बी राठोड मंडळ कृषी अधिकारी कजगाव, एम जे वाघ मंडळ कृषी अधिकारी भडगाव, हे सदस्य असून महेश वाघ साहेब कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भडगाव हे भरारी पथकाचे सदस्य सचिव आहेत.

कृषी केंद्रांची तपासणी दरम्यान साठा नोंद वही अद्यावत नाही, परवाना दर्शनी स्थळी लावलेला नाही, साठा फलक अद्यावत नाही अशा किरकोळ स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्यामुळे संबंधितांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. तसेच गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास संबंधित बियाणे विक्री केंद्राचे परवाने निलंबनाची कार्यवाही सुरु करण्यात येणार असल्याचे पथकाचे अध्यक्ष बी.बी गोरडे यांनी सांगितले.

खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतकर्‍यांना दर्जेदार व वाजवी दरात बियाणे उपलब्ध व्हावे त्यांची फसवणूक होऊ नये याकरिता भरारी पथकाची करडी नजर असून अचानक कृषी केंद्रांना भेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे. ज्या कृषी केंद्रात गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून येतील त्यांचे परवाने निलंबन करण्यात येणार आहे. सर्व बियाणे विक्रेते यांनी शेतकर्‍यांना दर्जेदार व वाजवी दरातच बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे,मुदत बाह्य किंवा चढ्या दराने बियाण्याची विक्री करू नये असे आढळून आल्यास संबंधित विक्री केंद्रावर बियाणे कायदा १९६६ नुसार कारवाई करण्यात येईल.

शेतकर्‍यांनी अधिकृत परवानाधारक बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे व खरेदीची पक्की पावती अथवा बिल प्राप्त करून घ्यावे. तसेच शेतकर्‍यांनी एमआरपी पेक्षा जास्त पैसे देऊ नये. अनधिकृत किंवा खाजगी व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचे बियाणे खरेदी करू नये त्यामुळे शेतकर्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षी स्वदेशी ५ हे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होणार नसल्याने कोणीही ते खरेदी करू नये. तसेच तण नाशकाला सहनशीलअसलेले एचटीबीटी हे प्रतिबंधित बियाणे खरेदी करू नये अशा प्रकारचे बोगस बियाणे अनधिकृत वा खाजगी व्यक्ती द्वारे विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित कृषी विभागात तक्रार करण्यात यावी.तसेच चढ्या दराने बियाणे विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित कृषी विभागास संपर्क करून फसवणूक टाळावी तसेच बीजप्रक्रिया व उगवणक्षमता तपासूनच, ७५ ते १०० मीमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन देखील कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

Protected Content