‘अग्निपथ’ योजनेंतर्गत औरंगाबाद येथे सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत औरंगाबाद येथे १३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सैनिक भरतीत जळगाव जिल्ह्यातील तरूणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भारत सरकार यांचेकडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत १३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानात सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरील सैनिक भरतीमध्ये औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड व परभणी या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देखील भरती प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे.

सैनिक भरतीसाठी १ जुलै पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात करण्यात आली असून ३० जुलै पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. उमदेवारांना परीक्षेबाबत प्रवेशपत्र ७ ते ११ ऑगस्ट या कालावधीत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सदरच्या भरती प्रक्रिये करीता उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्ष करण्यात आली आहे. विस्तृत तपशिल www.join indian army.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी भरतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Protected Content