जिल्हा शल्य चिकित्सकाच्या बेजबाबदारपणामुळे जामनेरात संताप

जामनेर प्रतिनिधी । सर्दी, खोकला, तापाबाबत विचारणा करण्यासाठी डॉक्टरच पाहिजे असे नाही. आम्ही अंगणवाडी सेवीकांनाही प्रशिक्षण दिले आहे. असे वक्तव्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी राठोड यांनी केल्याने येथे संताप व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तपासणीसाठी पोलिस जामनेर उपजिल्हा रूग्णालयात पाठवीत होते. मात्र तेथे सातपैकी एकही डॉक्टर नव्हते. आलेल्यांना गेटबाहेरच नर्सकडून विचारणा करून माघरी पाठवीले जात होते. याबाबत विचारणा केली असता जिल्हा शल्य चिकित्सकांनी सर्दी, खोकला, तापाबाबत विचारणा करण्यासाठी डॉक्टरच पाहिजे असे नाही. आम्ही अंगणवाडी सेवीकांनाही प्रशिक्षण दिले असल्याचे बेजबाबदार वक्तव्य केले. रविवार ता. २२ रोजी सकाळपासूनच जनता कर्फ्यूमुळे पोलिस व नगरपालिका प्रशासनाने नाकाबंदी केली. त्यावेळी मुंबई, पुण्याहून काही लोक खाजगी वाहनांनी गावाकडे जाण्यासाठी जामनेरात आले. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी बाहेरून येणर्‍या सर्व प्रवाशांना जामनेर उपजिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठवीले. मात्र त्या ठिकाणी पावणे नऊ वाजेपर्यंत सातपैकी एकही डॉक्टर उपस्थीत नव्हते. केवळ एक नर्स उपस्थीत होत्या. त्यांनी गेटजवळच रूग्णांना विचारपूस केली. व कोरोनाचा संशय असल्यास जळगावला तपासणीसाठी जाण्याचा सल्ला देऊन टोलवीले. त्यामुळे आलेल्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

जामनेर उपजिल्हा रूग्णालयात सात वैद्यकीय अधिकारी असून त्यांनी सर्वांनी मिळून एकेक दिवस ड्युटी वाटून घेतलेली आहे. त्यातही बराचवेळा डॉक्टरांना फोन करूनच बोलवावे लागत असल्याची रूग्णांची नेहमीचीच ओरड आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांना विचारणा केली असता सर्दी, खोकला, तापाबाबत विचारणा करण्यासाठी डॉक्टरच हवे असे नाही, आम्ही अंगणवाडी सेवीकांनाही प्रशिक्षण दिले असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर मात्र डॉ.प्रशांत महाजन यांनी येऊन आलेल्यांची विचारपूस, तपासणी करून दाखला दिला.

तर दुसरीकडे जामनेर उपजिल्हा रूग्णालयात प्रसूत झालेल्या सात महिला नवजात शिशूंसह अ‍ॅडमीट आहेत. रविवारी प्रसूत महिलांसोबतच्या काही महिला रस्त्यावर चहा मिळतो का? हे बघण्यासाठी रूग्णालयाबाहेर पडल्या. मात्र शहरात कडकडीत बंद असल्याने त्यांना कुठेही चहा नाश्ता उपलब्ध झाला नाही. त्यांना विचारणा केली असता प्रसूत महिलांसाठी रूग्णालयाकडूनच चहा नाश्ता दिला जातो. मात्र रविवारी तो दिला गेला नाही. त्यामुळे प्रसूत झालेल्या या महिलांना उपाशी पोटी बसण्याची वेळ आली. याबाबत स्थानिक पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर चहाची व्यवस्था करण्यात आली. याही उपजिल्हा रूग्णालयातील हलगर्जीपणाचे दर्शन घडले.

Protected Content