जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद मंडळ उद्घाटन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागाचे माजी सचिव नीळकंठ गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले.
श्री. गायकवाड कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, चौफेर वाचन, वाचनातल्या नोंदी, बहुश्रुतता, बोलण्याचा सराव आणि आत्मविश्वास ही पंचसूत्री आपणाला प्रभावी वक्ता होण्यास सहाय्यभूत ठरेल.या बरोबरच वर्तमानपत्र, नियतकालिके, ग्रंथ, इंटरनेट व अन्यविध प्रसार माध्यमांचे सहाय्य घेऊन आपल्या ज्ञानात भर घातली पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी श्री.यशवंत ठोसरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वादविवाद मंडळ प्रमुख प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी तर आभार प्रा.रुपम निळे यांनी मानले. सूत्रसंचालन गिरीश पाटील या विद्यार्थ्याने केले.
रोजच्या बोलण्यात व भाषणात घेतलेल्या नोंदींचे दाखले देत गेल्यास वक्त्याचे बोलणे प्रभावी होते. वक्तृत्व ही जशी कला आहे, तसे ते शास्त्र देखील आहे. प्रभावी संभाषणामुळे आजच्या विद्यार्थ्यांना करियरच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा.एस ओ उभाळे यांचे मार्गदर्शन लाभले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.