वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हनुमान जयंतीनिमित्त वरणगाव येथील रेवा कुटीमध्ये भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित या ठिकाणी वासुदेव परिवाराच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, ज्यामध्ये शेकडो भाविकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५ वाजता गणेश आराधना आणि प्रभु श्रीराम स्तुतीने करण्यात आली. त्यानंतर हनुमान चालीसाच्या प्रत्येक ओवीचे सामूहिक पठण करण्यात आले. विशेष म्हणजे, ११ च्या गटात एकूण ४४१ हनुमान चालीसा संगीतमय पद्धतीने सादर करण्यात आल्या. या पठणासोबत प्रत्येक ओवीसाठी हवन करण्यात आले असून, एकूण १६,८८० हवन आहुती देण्यात आल्या.

या धार्मिक कार्यक्रमात तुकाराम पाटील, वैशाली पाटील, पेचिमुत्थु नाडर, सिल्वराणी नाडार, डॉ. रवींद्र माळी, विवेक पाटील, सुलोचना पाटील, डॉ. रेणुका पाटील, दीपक फेगडे, डॉ. महेश फिरके, मनोज गोसावी, उमेश माळी, कमलेश येवले, कुणाल शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, चंद्रकांत बढे, बाळकृष्ण चव्हाण, दिनकर पाटील, प्रकाश पाटील, सुचिता येवले, सुनंदा येवले, प्रतीक बोरणारे, श्लोक बोरणारे, आशिष येवले, वेदांत पाटील, दुर्वांग पाटील, गौरी येवले, सतीश जंगले, राहुल माळी, सुनीता चौधरी, चेतन झोपे, आकाश भंगाळे, सारंग जोशी, अनिकेत चव्हाण यांच्यासह अनेक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले आणि दीपक फेगडे यांनी आभार प्रदर्शन केले.
हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने येथे रामायणकालीन राम सेतू दगडाचे विशेष आकर्षण ठेवण्यात आले होते. प्रभु श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा दगड आजही पाण्यात तरंगतो, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे. या दगडाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या पवित्र तीर्थाचे प्राशन करून भक्तांनी समाधान व्यक्त केले, असे वासुदेव परिवाराचे सदस्य कमलेश येवले यांनी सांगितले.
दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाला आता एक वर्ष पूर्ण झाले असून, या उपक्रमाला मिळणारा वाढता प्रतिसाद आयोजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भाविकांचा वाढता उत्साह हा संजीवनीसारखा असल्याचे मत राहुल माळी यांनी व्यक्त केले. भविष्यात आणखी व्यापक स्वरूपात कार्यक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.



