जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्याने पायी जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेले ममुराबाद येथील रहिवासी राजेंद्र शांताराम पाटील (वय ४८) यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजेंद्र यांची प्राणज्योत बुधवारी १ एप्रिल रोजी मालवली. या घटनेमुळे ममुराबाद परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास राजेंद्र पाटील हे फुपनगरी फाट्याकडून कानळदा गावाकडे पायी जात होते. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात राजेंद्र पाटील हे गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी १ एप्रिल रोजी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी मयताचे भाऊ महेश शांताराम पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



