२०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानी

 

 

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था । भारतीय अर्थव्यवस्था ही सन २०२५ पर्यंत जगातील पाचवी तर सन २०३० मध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असं भाकीत सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (सीईबीआर) या संस्थेनं वर्तवलं आहे.

या संस्थेच्या एका अहवालात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. भारत सन २०१९ मध्ये ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. मात्र, सन २०२० मध्ये भारत पुन्हा सहाव्या स्थानावर फेकला गेला.

सीईबीआरच्या अहवालात म्हटलं की, कोरोना महामारी आणि रुपयाची डळमळीत स्थिती यामुळे भारत सहाव्या स्थानी ढकलला गेला. या वर्षी ब्रिटनने भारताला मागे टाकलं होतं. पण भारत २०२५ मध्ये पुन्हा ब्रिटनच्या पुढे निघून जाईल.

भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ९ टक्के आणि २०२२ मध्ये ७ टक्क्यांनी वाढेल असंही सीईबीआरने म्हटलं आहे. आर्थिक स्वरुपात भरभराट झाल्यानंतर स्वाभाविकपणे भारताचा वेग कमी होईल आणि सन २०३५ मध्ये जीडीपीची वाढ ५.८ टक्के राहिल. यादरम्यान भारत सन २०३० मध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसेच भारत २०२५ मध्ये ब्रिटन, २०२७ मध्ये जर्मनी आणि २०३० मध्ये जपानला मागे टाकेल, असंही या अहवालात म्हटलं आहे.

चीन २०२८ मध्ये अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की चीन २०३३ पर्यंत या स्थानावर पोहोचेल. मात्र, कोविड-१९ महामारीने परिस्थिती बदलून टाकली. चीन वेगाने या संकटातून बाहेर पडला आहे. तर अमेरिकेचा अजूनही संघर्ष सुरुच आहे. याच कारणामुळे चीन पाच वर्षांमध्येच अमेरिकेपेक्षा पुढे निघून जाईल.

Protected Content