संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असं भाजपाने स्पष्ट केलं आहे  

 

 

. राठोड यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असं भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केलं आहे. बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात केलेल्या कथित आत्महत्येप्रकरणात राठोड यांचं नाव घेतलं जात असल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कारवाई करावी अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे.

 

भातखळकर यांनी  एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नाव समोर घेतलं जाणाऱ्या मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करुन एफआयआर दाखल करण्याची गरज होती. मात्र राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कसली वाट पाहतंय?, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच भातखळकर यांनी राठोड प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर  निशाणा साधताना, बलात्कारी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची पाठराखण करणारं हे सरकार असल्याचा टोलाही लगावला आहे.पुण्यामध्ये आत्महत्या केलेली तरुणी आणि मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप फिरत आहेत. तरी हे मंत्री उघड माझ्याने फिरतायत. यावर राज्यात काहीच होत नाहीय हे खेदजनक असल्याचेही भातखळकर यांनी म्हटलं आहे.

 

राठोड प्रकरणामुळे सरकारची बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री नाराज आहे. अधिवेशनात या मुद्द्यावरुन विरोधकांकडून लक्ष्य केलं जाण्याचा प्रयत्न लक्षात घेता उद्धव ठाकरे हे राठोड यांच्यासंदर्भात काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यताही काही जाणकार व्यक्त करत आहेत.

Protected Content