शेतकरी आंदोलनास पाठींब्यासाठी भारत बंद आंदोलनात सहभागी व्हा

 

अमळनेर, प्रतिनिधी । केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधात आडमुठे धोरण स्वीकारल्याने या विरोधात उद्या मंगळवार दि ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे, तरी देशाचे केंद्रबिंदू असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अमळनेर शहर व तालुका आणि मतदारसंघातील सर्व व्यापारी बांधव, खाजगी आस्थापना व तमाम जनतेने या बंदमध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी करावा असे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले आहे.

केंद्र सरकारने शेतकरी-शेतमजूर विरोधात तीन काळे कायदे पारीत केले आहेत. ते कायदे रद्द करण्यासाठी देशात सर्वच ठिकाणी आंदोलने केली गेली.
परंतु गेल्या ८ ते १० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर भारतातील सर्व शेतकरी संघटना तसेच हरीयाणा, पंजाब, बिहार, इ. राज्यातील शेतकरी बांधव, कायदे रद्द करण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून रस्त्यावर उतरले आहेत. अशावेळी अमानुष केंद्र सरकार शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधूर, थंड पाण्याचा मारा, अशा क्रूर कृती करीत आहे. याचा निषेध व आंदोलनास पाठिंबा म्हणून विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी उद्या दि ८ रोजी भारत बंदची घोषणा केली असून, राज्यातील महाविकास आघाडी शासनाने देखील या बंदला जाहीर पाठिंबा दिलेलाच आहे. अमळनेर तालुका व परिसर शेतकरी बहुलच असल्याने शेतकरी राजा या भूमीचा आत्माच आहे, यासाठी बळीराजास पाठिंबा देणे काळाची गरज आहे. हा अन्नदाता शेतकरी जगला तरच आपण सर्व जगू या भावनेने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला फक्त एक दिवस कडकडीत बंद पाळून पाठींबा द्यावा असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

Protected Content