शेतकरी आंदोलनाचा ‘ जिओ’ला फटका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी केलेल्या बहिष्काराच्या आवाहनानंतर जीओला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे .

 

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. सरकार काही उद्योजकांसाठी हे कायदे करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान केला होता. त्याचबरोबर रिलायन्सच्या वस्तू आणि सेवांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन शेतकऱ्यांनी केलं होतं. त्याचा परिणाम ‘रिलायन्स जिओ’वर झाल्याचं ‘ट्राय’च्या आकडेवारीतून समोर आलं आहे. रिलायन्स जिओचे ग्राहक मोठ्या संख्येनं घटले आहेत.

 

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओलाही शेतकरी आंदोलनाची झळ बसली आहे. कंपनीच्या पंजाब व हरयाणातील ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. डिसेंबर २०२० मधील अहवाल ट्रायकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात पंजाब व हरयाणात कंपनीच्या ग्राहक संख्येत घट झाल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही राज्यात एका महिन्यातच ग्राहकाची संख्या कमी झाली आहे.

 

 

 

कंपनीचे १८ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच ग्राहक घटले आहेत. नोव्हेंबर २०२०मध्ये कंपनीच्या ग्राहकांची संख्या १.४० कोटी इतकी होती. ती डिसेंबरअखेरपर्यंत १.२५ कोटी इतकी कमी झाली आहे. पंजाबमध्ये कंपनीच्या ग्राहक संख्येत झालेली ही १८ महिन्यातील सर्वाधिक घट आहे.

 

हरयाणामध्येही जिओच्या वापरकर्त्यांची संख्या लक्षणीय घटली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये कंपनीच्या ग्राहकांची संख्या ९४.४८ लाख इतकी होती. ती डिसेंबरअखेर ८९.०७ लाख इतकी झाली आहे. २०१६मध्ये जिओ दूरसंचार सेवा सुरू केल्यानंतर हरयाणात कंपनीच्या ग्राहक संख्येत प्रथमच इतकी घट झाली आहे. रिलायन्सकडून डिसेंबरमध्ये निवेदन जारी केलं होतं.

 

या निवेदनात कंपनीनं ग्राहक सेवेत झालेल्या घटीबद्दलही स्पष्टीकरण दिलं होतं. कोरोनामुळे मागील तिमाहीत कंपनीच्या ग्राहक संख्येवर परिणाम झाल्याचं यात म्हटलं होतं. त्याचबरोबर निवडक भौगोलिक प्रदेशांमध्ये रिलायन्स समूहविरुद्ध कुहेतूनं प्रेरीत असलेली बदनामी करणारी मोहीम चालवली गेली, त्याचाही परिणाम झाल्याचं रिलायन्सनं म्हटलं आहे.

Protected Content