शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा

 

 

नागपूर:: वृत्तसंस्था । राहुल गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यास आम्हालाच फायद्याचे आहे. त्यांच्यामुळे आम्हाला चांगली संधी असते. सध्या कॉंग्रेसला अध्यक्षच सापडत नाही. त्यामुळे शरद पवारांना कॉंग्रेसचे अध्यक्ष करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.

पवार जर एनडीएमध्ये आल्यास मोदींचे हात आणखी बळकट होतील, अशी मुक्ताफळेही आठवले यांनी उधळली.

कोरोना काळात मृत्यू झालेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी व एका पुस्तक प्रकाशनप्रसंगी नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

‘पवार यांना कॉंग्रेस पक्षाने अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना पंतप्रधान होण्याची संधी असतानाही डावलले. संसदीय बोर्डाच्या बैठकीतही त्यांच्याशी योग्यपध्दतीने वागत नव्हते. दस्तुरखुद्द सोनीया गांधी यांनीही त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. पवार यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना अन्याय झाला. आता हा अन्याय दूर करण्याची संधी काँग्रेसजवळ आहे. त्यामुळे त्यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष केल्यास काय हरकत आहे, असा टोला आठवले यांनी लगावला.

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्र सरकारचे मंत्री वेगवेगळे आरोप करीत आहेत. कुणी म्हणतात खलीस्तानी घुसले आहेत. कुणाला त्यात माओवादी घुसल्याची शंका आहे. तर, कुणाला यात चीन व पाकिस्तानचा हात असल्याचा दावा आहे. यावर आठवले यांनी असे काहीही नसल्याचे स्पष्ट करीत केंद्र सरकारला घरचा आहेर दिला. परंतु, सरकारने या शंका दूर करण्यासाठी चौकशी करावी अशी मागणीही केली. शेतकरी आंदोलन हे पंजाब व हरीयाणा या दोन राज्यापुरतेच मर्यादीत असल्याचा दावा करीत, शेतकऱ्यांनी आंदोलनाचे दिवस काढू नयेत असे आपणास वाटत असल्याची भूमिकाही जाहीर केली. केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेणार नाहीत. त्याऐवजी दोन पाऊल शेतकरी व दोन पावले केंद्राने मागे घ्यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

अंबानी व अदानी आधीच श्रीमंत आहेत. त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. त्यांच्या फायद्यासाठी हे कृषी कायदे तयार करण्यात आले असतील, हा आरोपही आठवले यांनी फेटाळून लावला. आठवले यांनी रिपाईत यावेळी आझाद विदर्भ सेना ही संघटना विलीन झाल्याची घोषणा केली. भुदान चळवळीवेळी दान दिलेल्या ४७ लाख एकर जागेची माहिती मिळावी यासाठी राज्य सरकारला पत्र लिहीणार असल्याचे सांगितले.

आगामी निवडणूकीत मुंबई मनपातून शिवसेना हद्दपार होईल. भाजपसोबत रिपाईची युती असेल. गेल्यावेळी भाजपने ८२ जाागा जिंकल्या. सेनेला ९४ मिळाल्या. आता रिपाई सोबत असेल. त्यामुळे भाजपला बहुमत मिळेल. भाजपचा महापौर तर, रिपाईचा उपमहापौर होईल.

यापुर्वी कॉंग्रेससोबत युती असताना रिपाईला १२ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी रिपाईचे चंद्रकांत हंडोरे महापौर झाले होते, आची आठवण त्यांनी करून दिली. मनपा निवडणुकीत कितीही एकत्रीत लढण्याचे दावे करण्यात आले तरी, कॉंग्रेस शेवट वेगळी लढेल, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. शिवाय, नुकत्याच संपलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फायदा झाला. पुढच्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष पराभूत होईल, असे भाकीतही त्यांनी केले.

अॅड. प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपाई ऐक्य होत नाही. त्यामुळे आम्ही आमचा रिपाई पक्ष बळकट करण्याचर भर दिला आहे. आमचा निळा झेंडा व नाव कायम आहे. अॅड. आंबेडकरांनी झेंडा व नावही बदलले. त्यांची ऐक्याची मानसिक तयारी नाही. त्यामुळे आता रिपाई ऐक्य होणे नाही. परंतु, आंबेडकर यांनी एनडीएत आल्यास त्यांनाही चांगली संधी असेल. समाजालाही फायदा होईल, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

Protected Content