जळगाव प्रतिनिधी । व्यक्तिमत्व विकास हा मानवाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतो यासाठी सकस आहार गरजेचा आहे, असे प्रतिपादन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी केले. शिक्षण शास्त्र महाविद्यालयात आयोजित “व्यक्तिमत्व विकास” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर फिजिशियन डॉ. अपर्णा मकासरे उपस्थित होत्या. पुढे बोलताना डॉ. राणे म्हटले की, तणाव हा आजाराचे मूळ कारण आहे. तणावाचे नियोजन करता यावे, यासाठी योग्य आहार जितका महत्त्वाचा आहे, तितकेच महत्त्वाचे कुटुंबाला वेळ देणे देखील आहे. यामुळे आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो, असे विचार त्यांनी व्यक्त केले. केसीई सोसायटी संचालित शिक्षण शास्त्र महाविद्यालयात ही कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेचे उदघाटन डॉ.अपर्णा मकासरे यांनी केले. दीपप्रज्वलन तसेच सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले. पहिल्या सत्रात डॉ. अपर्णा यांनी ‘आहार आणि सौंदर्य” या विषयावर, दुसऱ्या सत्रात “व्यक्तिमत्व विकास आणि ताणाचे नियोजन” यावर मार्गदर्शन केले. तर तिसऱ्या सत्रात जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदीप केदार यांनी “व्हॉइस कल्चर” या विषयावर मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात डॉ. सुनीता नेमाडे यांनी “जीवनमूल्य आणि भारतीय संस्कृती” या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. सुनीता नेमाडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार तेजस्विनी वाणी हिने केले. यशस्वीतेसाठी युवती सभेच्या कार्यकारिणी सहभागी होत्या. कार्यक्रमाला प्रा.डॉ.रंजना सोनवणे, प्रा.डॉ.वंदना चौधरी, प्रा.डॉ.स्वाती चव्हाण, प्रा.डॉ.कुंदा बाविस्कर, प्रा.आर.सी.शिंगाने, प्रा. केतन चौधरी आदी उपस्थित होते.