सांगली: वृत्तसंस्था । कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारचे सर्व मंत्री आज काळ्या फिती बांधून काम करीत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र सीमाभागातील मराठी भाषिकांसोबत आहे. लवकरच सीमाभाग महाराष्ट्रात सामील होईल,’ असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
ते रविवारी इस्लामपूर येथे बोलत होते. ‘महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद सुप्रीम कोर्टात असतानाही कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे.
दरवर्षी एक नोव्हेंबरला कर्नाटक सरकार विजय दिवस साजरा करते. याच पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी भाषिक काळा दिवस साजरा करतात. कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरत काळा दिवस साजरा करतात. याच दिवशी बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा मेळावादेखील होतो.
सीमाभागातील मराठी भाषिकांची चौथी पिढी महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत आहे. सीमावासियांना पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारने एक नोव्हेंबरला काळ्या फिती बांधून काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रविवारी राज्य सरकारमधील सर्व मंत्री काळ्या फिती बांधून काम करीत आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, ‘सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात सामील होण्यावर ठाम आहेत. गेल्या ६० वर्षांपासून या एकाच मागणीसाठी त्यांची लढाई सुरू आहे. सीमावाद सुप्रीम कोर्टात असतानाही कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अन्याय केला जातो. मराठी भाषिकांवर दडपशाही केली जाते. महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक यांच्यासोबत आहेत. लवकरच सीमाभाग महाराष्ट्रात सामील होईल.
दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी चंद्र, सूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकमध्येच राहील, असे वक्तव्य केले होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या वक्तव्याचा निषेध करीत, एक नोव्हेंबरला महाराष्ट्रातील नागरिकांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यावर आक्षेप घेतला. ते कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये बोलत होते.