मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार, पंतप्रधान मोदींकडून संकेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत सरकारकडून आता मुलींच्या विवाहासाठी किमान वयोमर्यादा काय असावी यावर पुन्हा एकदा विचार केला जात आहे. तसे संकेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला केलेल्या आपल्या संबोधनात दिलेत. यानुसार लग्नासाठी मुलींचेही वय आता १८ वरून वाढवून २१ केले जाऊ शकते.

 

पंतप्रधान मोदी म्हणाले, मुलींच्या विवाहासाठी किमान वयोमर्यादेवर पुन्हा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. समितीने संबंधित अहवाल सादर केल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. मुलींचे विवाहाचे वय वाढवण्यामागचा मुख्य उद्देश मातृ मृत्यूदर कमी करण्याचा आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानंही यासंदर्भात केंद्राला निर्देश दिले होते. तसेच, महिलेला आई बनण्याच्या योग्य वयाबद्दल सल्ला देण्यासाठी एक टास्क फोर्स बनवण्यात येईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या मागच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते. अर्थ मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टास्क फोर्सच्या रिपोर्टनंतर मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलण्याचे संकेत दिले आहेत.

Protected Content