मुलांचं वय वाया गेलं, संधी हुकली तर जबाबदार कोण, एमपीएससी परीक्षा आताच घ्या : देवेंद्र फडणवीस

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । ‘आपण एमपीएससीच्या परीक्षा अनंत काळासाठी पुढे ढकलू शकत नाही. वय निघून जातं, संधी हुकतात, या परीक्षा घेतल्याच पाहिजेत. सरकारचा निर्णय चुकीचा आहे, आता ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा आताच व्हायला हव्यात”, असं विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

 

एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आता राज्यभरात विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन सुरु आहे. कुठल्याही परिस्थितीत 14 मार्च रोजीच परीक्षा झाली पाहिजे अशी आक्रमक मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारच्या या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. काहीही झालं तरी परीक्षा आताच घेतली गेली पाहिजे, अशी भूमिका फडणवीस यांनी व्यक्त केली आहे

 

“आतापर्यंत या परीक्षा चार वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. समजा काही कारणांमुळे काहीजण परीक्षा देऊ शकले नाहीत. तर त्यांना पुढे संधी देता येईल. राज्यात लाखो जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे कुठल्या कारणामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना तिथे सामावून घेण्याचा पर्याय सरकारकडे आहे. पण काही परीक्षार्थींमुळे सर्व विद्यार्थ्यांना वेठीला धरणं चुकीचं आहे”, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

 

एकतर मुलांनी एवढा अभ्यास केलेला असतो. त्यात चार वेळा ही परीक्षा पुढे ढकलली आहे. अशावेळी मुलांची मानसिक अवस्था काय होत असेल, याचा विचार करायला हवा. इतकच नाही तर वयोमर्यादेची अट आडवी येते. वय निघून गेल्यावर त्यांनी पाहिलेली स्वप्न भंग होतात. त्यामुळे मला असं वाटतं की, या परीक्षा आताच घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांची मागणी अगदी योग्य असल्याचंही फडणवीसांनी आवर्जुन सांगितलं.

 

परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सरकारनं दिलेलं कोरोनाचं कारण पटण्यासारखं नाही. कोरोना काळात विधिमंडळाचं अधिवेशन पार पडतं. राजकीय पक्षांचे मेळावे होतात. सत्ता पक्षांच्या ट्रॅक्टर रॅली निघतात. मग परीक्षेसाठी तर सोशल डिस्टन्सिंग ठेवावंच लागतं. विद्यार्थी काही आजुबाजूला बसत नाही. तसंच MPSCच्या परीक्षा तर वेगवेगळ्या ठिकाणांहून घेता येतात. त्यामुळे जे कोरोनाचं कारण सांगितलं जात आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे सरकारनं कुठलंही कारण न देता MPSCची परीक्षा घेतलीच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलंय.

Protected Content