मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र सरकारने चीनला मोठा धक्का दिला आहे. केंद्राशी झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने तीन चिनी कंपन्यांच्या प्रकल्पावर स्थगिती आणली आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे 5 हजार कोटी रुपये इतकी आहे.
मॅग्नेटीक महाराष्ट्र 2 अंतर्गत राज्यातील उद्योग विभागाने 15 जून रोजी व्हिडोओ कॉन्फरसिंगद्वारे जगभरातील विविध कंपन्यांशी 16 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते. या 16 हजार कोटी रुपयांपैकी 5 हजार कोटी रुपयांचे करार तीन चीनच्या कंपन्यांशी करण्यात आले होते. चीन आणि भारताच्या सीमेवर 20 जवान शहीद होण्याच्या आधी हे करार करण्यात आले होते.मात्र सीमेवर 20 जवान शहीद झाल्यानंतर चीनविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. त्यामुळे चीनच्या कंपन्यांबरोबर केलेल्या या करारांचं काय करायचं याचा सल्ला राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागितला होता. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार चीनच्या कंपन्यांबरोबर करण्यात आलेले करार स्थगित करण्यात आले आहेत. दरम्यान, ज्या प्रकल्पांवर भारताने बंदी घातली आहे त्यापैकी एक म्हणजे पुण्यालगतच्या तळेगाव इथं विद्युत वाहनांचा मोठा कारखाना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सुमारे 3500 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. ही कंपनी 1000 कोटींची गुंतवणूक करणार असून यामध्ये 1500 रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार होते.