मराठा, धनगर समाज एकत्र आल्यास दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो– महादेव जानकर

 

जेजुरी: वृत्तसंस्था । मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केले.

 

महादेव जानकर यांनी हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. या कार्यक्रमाला होळकर घराण्याचे वंशज आणि छत्रपती संभाजीराजे भोसले हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन महादेव जानकर यांनी राजकीय फटकेबाजी केली. आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत  असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या  सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असे महादेव जानकर यांनी म्हटले.

 

 

महादेव जानकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. महादेव जानकर यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

 

 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना युतीचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ, असे वक्तव्य केले होते. मात्र, गेल्या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही फडणवीस यांना धनगर समाजाला आरक्षण मिळवून देता आले नाही. याच काळात फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले महादेव जानकर यांनी आता थेट शरद पवार यांच्याकडेच मदत मागितल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

जेजूरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होऊ नये, यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले होते. मात्र भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आणि महादेव जानकर यांच्या उपस्थितीतच हा सोहळा पार पडत असल्यामुळे भाजप पक्षानेच पडळकर यांच्या भूमिकेला फारसे महत्त्व दिले नसल्याचे बोलले जात आहे

Protected Content