पूजा चव्हाण आत्महत्या ; सत्य जनतेसमोर येईल — मुख्यमंत्री

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  “पूजा चव्हाण आत्महत्येची व्यवस्थित चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई होईल.” असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सांगितलं

 

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं दिसत आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत हा मुद्दा उचलून धरला असून, शिवसेना मंत्र्यावरच थेट आरोप केला आहे. यावर आज (शनिवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

 

“गेले काही दिवस,  काही महिने काही वेळेला आपलं असं लक्षात आलेलं आहे. आय़ुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. तर असाही प्रयत्न होता कामा नये व याचबरोबर सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशीतून जनतेसमोर येईल.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

 

 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाभोवती राज्यातील राजकारण फेर धरताना दिसत आहे. या प्रकरणी एका मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी रात्री भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले होते. मात्र, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नावं घेणं टाळलं आहे. त्यामुळे भाजपात एकवाक्यता नाही का?, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.

Protected Content