ब्लॅकमेलींगमुळे त्रस्त झालेले धरणगावचे रेशन दुकानदार परवाना सोडण्याच्या तयारीत

धरणगाव प्रतिनिधी । ब्लॅकमेलरकडून होणार्‍या अडवणुकीमुळे त्रस्त झालेल्या तालुक्यातील १०५ रेशन दुकानदारांनी आपापला परवाना सोडण्याची तयारी केली असून याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना निवेदन देऊन आपली समस्या सोडविण्यासाठी साकडे घातले.

पालकमंत्र्यांना निवेदन

तालुक्यातील १०५ रेशन दुकानदारांच्या शिष्ट मंडळाने तहसील कार्यालयात दि.२९ रोजी सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, प्रांताधिकारी विनय गोसावी व तहसीलदार नितीनकुमार देवरे,नगराध्यक्ष निलेश चौधरी,चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास विसावे,माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांच्या समक्ष भेट देवून १०५ रेशन दुकानदारांच्या राजीनामा स्वीकारण्यात यावा याबाबत निवेदन दिले.

राजीनामे स्वीकारावेत

शहरातील नागरिकांना येथील दुकानदार रेशनचे तीन टप्प्यात वाटप करतात पण या काळात अनेक नागरिक त्यांना त्रास देतात.चुकीच्या धान्याची मागणी करतात.प्रसंगी पैसे न देता धान्य मागतात अशा विविध समस्यांनी रेशन दुकानदार त्रासले आहेत. महिला दुकानदारांशी अनेकांनी गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा लोकांवर पोलीस कारवाई व्हावी अशी मागणी या दुकानदारांनी पालकमंत्री पाटील यांचेशी बोलतांना केली.त्यामुळे धरणगाव तालुक्यातील रेशन दुकानदार त्रस्त झाले आहेत.त्यामुळे आम्ही पुढील महिन्यात वाटप करीत नाहीत आमचे राजीनामे स्वीकृत व्हावेत अशी मागणी त्यांनी केली.

कारवाईचे आदेश

रेशन दुकानदारांच्या समस्या ऐकून घेतल्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रेशन दुकानदार यांना शासन आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले व ब्लॅकमेल करणार्‍या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी व तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना दिले.तसेच आशा लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे व अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत अभय दिले जाणार नाही.त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. तर, रेशन दुकानदारांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून खंडणी घेणारी व्यक्ती कुणीही असो हे खपवून घेतले जाणार नाही त्यांच्या विरोधात शिवसेना आंदोलन छेडेल असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी या बैठकीत व्यक्त केले.

तो ब्लॅकमेलर कोण ?

या रेशन दुकानदारांना त्रास देण्यात आघाडीवर असलेल्या एका व्यक्तीचे नाव पुढे असल्याचे एका अधिकार्‍याने नाव न घेता सांगितले असून लवकरच त्याचेवर योग्य कारवाई होईल अशी चर्चा आज होती. त्यामुळे हा नेमका कोण याविषयी तर्क वितर्क नागरिकांमध्ये सुरू होते.
त्यामुळे आजच्या बैठकीत रेशन दुकानदार यांनी नेहमीप्रमाणे धान्याची वाटप करावी प्रशासन त्यांचे सोबत असल्याचे आश्‍वासन देण्यात येऊन पुढील महिण्यात वाटप करण्याचे आवाहन या रेशन दुकानदारांना करण्यात आले
या विषयी तहसीलदार लवकरच गोपनीय अहवाल वरिष्ठांना पाठविणार असल्याचे समजते.

Protected Content