फायद्यासाठीच राज ठाकरे यांनी भूमिका बदलली ; नाणार प्रकल्प विरोधकांचा आरोप

मुंबई: वृत्तसंस्था ।  नाणार प्रकल्पाला विरोध करुनही राजकीय फायदा न मिळाल्यामुळे आता ‘इतर फायदे’ पदरात पाडून घेण्यासाठी मनसेने भूमिका बदलल्याचा आरोप कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेने केला आहे. 

२०१९  विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवार अविनाश सौंदळकर यांना २०१४ पेक्षा कमी मते पडली,पूर्वीच्या प्रकल्पग्रस्त १४ गावातून तीन आकडीही मते मिळाली नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तर मनसे नावालाही नव्हती. त्यामुळे आता नाणार परिसरातील राजकारणाला तिलांजली देऊन समर्थनाची भूमिका घेऊन अन्य काही फायदे होत असतील तर घ्यावेत, अशी मनसेच्या स्थानिक नेत्यांची भूमिका असल्याचा आरोप कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भडेकर यांनी केला. 

या संघटनेकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये कृष्णकुंजवर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलेले लोक नाणारचे ग्रामस्थ नसल्याचा दावा करण्यात आला आहे. नाणार प्रकल्पाचे समर्थक आणि आरआरपीसीएल  कंपनीचे अधिकारी अनेक महिन्यांपासून राज ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला मनसेचे नेते अनिल शिदोरे हे आरआरपीसीएल कंपनीचे सीईओ बालासुब्रमण्यम अशोक व अनिल नागवेकर यांना भेटले होते.

या भेटीनंतर मनसेच्या थिंक टँकच्या बैठकीत रोजगार, सीएसआर फंडातून विकास कामे, देवळे- घरे विस्थापनातून वगळणे, फसवणूक झालेल्या जमीनधारकाना स्पेशल पॅकेज या चतुसूत्री या मागण्यांच्या मोबदल्यात समर्थन देण्याविषयी विचारविनिमय झाला.  स्थानिक पातळीवर पक्षाच्या पिछेहाटीचा मुद्दा चर्चिला गेला. या सगळ्यानंतर मनसेच्या भूमिकेत बदल होऊन राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिल्याचा आरोप रामचंद्र भडेकर यांनी केला आहे.

नाणार प्रकल्पाचे समर्थक राज ठाकरे यांना २८ फेब्रुवारीलाच भेटणार होते. पण मुख्यमंत्र्यांना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला व ही भेट एक आठवडा लांबणीवर पडली. समर्थनाच्या बदल्यात या सगळ्यांना कंपनी नक्की काय देणार हे लवकरच कळेल.

 

 

स्थानिकांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता केवळ कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या नादाला लागूनच अचानक दोन वर्षानंतर समर्थनाची डायरेक्ट भूमिका मांडणे हे सरळ सरळ विश्वासघातकी कृत्य आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच दुःखावलो गेलो आहोत. आमच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास असून कुणी कितीही प्रयत्न केला तरी रिफायनरी नाणार परिसरात येऊ देणार नाही, याची सर्वांनी खात्री बाळगावी, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Protected Content