फटाके मर्यादित स्वरुपात वाजवा- उद्धव ठाकरे

 

मुंबई : वृत्तसंस्था । फटाक्यांवर बंदी घालायची का? ती जरुर घालता येईल पण ती मुळीच घालणार नाही. तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत जसं सहकार्य केलं तसंच दिवाळीलाही करा. रोषणाई करा. दिवे लावा, फटाकेही वाजवा पण मर्यादित स्वरुपात वाजवा असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

दिवाळीत तुमच्यावर कोणतीही आणीबाणी मी लादणार नाही. दिवाळीचा सण आपण सगळ्यांनी नक्की साजरा केला पाहिजे मात्र प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवणं टाळा. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायचे नाहीत असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. फटाक्यांवर बंदी घातलेली नाही. मात्र प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवू नका आणि मर्यादित स्वरुपात फटाके वाजवा असंही त्यांनी म्हटलं आहे.

लॉकडाउनच्या काळात आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्यामुळे आपण सगळेच काहीसे तणावमुक्त आहोत. मात्र दुसऱ्या लाटेची चिंता माझ्या मनात आहे. दुसरी लाट येऊ नये यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा चढता आलेख आपण जिद्दीने खाली आणला आहे. काही लोक म्हणत होते की परिस्थिती यांच्या हाताबाहेर चालली आहे मात्र त्यांना उत्तर मिळालं आहे. दिल्लीत तर रुग्णांची संख्या वाढता वाढे अशीच आहे. प्रदुषणामुळे रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी काळजी घ्यायची आहे.

मास्क लावला नाही तर दंड भरावाच लागणार मास्क न लावणारा एक माणूस चारशे जणांना संक्रमित करु शकतो. त्यानंतर ४०० जण किती जणांना संक्रमित करु शकतात याचा विचार तुम्हीच करा… त्यामुळे मास्क लावला नाही तर कारवाई केली जाणारच असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कोरोना गेला आहे असं कुणीही समजू नये.. त्यावर लस आलेली नाही त्यामुळे मास्क हेच आपलं शस्त्र आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे

Protected Content