प्रदूषण फक्त फटाक्यांनीच होते का ?

 

अहमदनगर: वृत्तसंस्था । फटाकेबंदीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे फटाके विक्रेता संघटनेनेही बंदीच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. फक्त फटाक्यांमुळेच प्रदूषण होते का? प्रदूषण करणाऱ्या अन्य घटाकांबद्दल काय भूमिका घेणार? असा सवालच फटाका विक्रेता असोसिएशनने केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी फटाकेमुक्त दिवाळीची संकल्पना मांडण्यात येत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर त्यावर नेत्यांकडूनही मते व्यक्त झाली आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या भूमिकेचे स्वागत केले तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मोठ्या आवाजाचे आणि जास्त धूर सोडणाऱ्या फटाक्यांवर थेट बंदीचीच मागणी केली.

आता नगरच्या फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, फक्त फटाक्यांमुळेच प्रदूषण होते का? ही भूमिका मांडणाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखविले आहे का? याशिवाय प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या अन्य घटकांसंबंधी अशी भूमिका घेतली जाणार का? असे सवाल त्यांनी केले आहेत.

फटाक्यांचे समर्थन करताना बोज्जा म्हणाले की, दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वांत मोठा सण आहे. गरीब आणि श्रींमतही आपापल्या परीने फक्त दोन-तीन तास फटाके वाजवून आनंद व्यक्त करीत असतात. त्यातून असे कितीसे प्रदूषण होणार? या उलट गाड्यांचा धूर, कचरा पेटविण्यामुळे होणारा धूर यांचे सतत आणि जास्त प्रदूषण होत असते. शिवाय फटाका व्यावसायात अनेक कुटुंब आहेत. त्यांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. बंदी घातली तर त्यांची उपासमार होईल. आजकाल वेगवेगळे फटाके आले आहेत. कमी आवाज, कमी धूर करणारे फटाकेही आले आहेत.

तांबे यांची प्रदूषण विरोधी भूमिका योग्य आहे. पण केवळ फटाके नव्हे तर अन्य घटकांचाही त्यांनी विचार करावा. फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी करताना त्यांनी फटाक्यांमुळेच प्रदूषण होते, हे सिद्ध करून दाखवावे. याशिवाय या व्यावसायात असलेल्या कुटुंबांचाही विचार करावा, असेही बोज्जा यांनी म्हटले आहे.

Protected Content