प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच योग्य मोबदला देण्यात येईल – ना. जयंत पाटील

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत अधिवेशनात तरतूद करून लवकरच योग्य तो मोबदला देण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आयोजित एका बैठकीत दिली. यावेळी मा. मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, संजय पाटील व पिडीत शेतकरी उपस्थित होते.

चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव, मुंदखेडा, कोदगाव व ओढरे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने कवडीमोल भावाने खरेदी केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर अक्षरशः अन्याय झाला आहे. दरम्यान प्रकल्पग्रस्त व शासनाच्या समनव्यातुन मध्यममार्ग काढत टप्य्याटप्प्यात निधी देण्याचे ठरले होते. या बदल्यात शेतकऱ्यांनी आपले कोट्यवधीचे व्याज देखील शासनाला सोडले होते. मात्र नंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि गेल्या २ वर्षात ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना एक रुपया देखील शासनाने दिला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली व त्यांनी जळगाव येथे आमरण उपोषण सुरू केले. सदर उपोषणाला माजी जलसंपदामंत्री गिरीष महाजन व जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधी यांनी भेट दिली व गिरीषभाऊ यांनी थेट जलसंपदा मंत्री यांना फोन करून आमरण उपोषणाची माहिती दिली. त्याअनुषंगाने धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मा. मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, पंचायत समिती गटनेते संजय भास्कर पाटील यांच्यासह पिडीत शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. व बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडली. दरम्यान या समस्यांवर मार्ग काढून कशाप्रकारे योग्य मोबदला देता येईल यासाठी माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार मंगेशदादा चव्हाण, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील आणि शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा केली. यामुळे सुचविलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल व येत्या अधिवेशनात तरतूद करून लवकरच योग्य तो मोबदला देण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तत्पूर्वी आढावा पूर्ण करून नियोजन विभाग आणि अर्थ विभागाशी बैठक करून सदर शेतकऱ्यांना मोबदला देण्याची सोय करण्यात येईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिली. तब्बल दोन तास चर्चा करण्यात आल्यानंतर बैठक पार पडली. तत्पूर्वी तात्काळ उपाययोजना म्हणून पुरवणी मागणी मांडून २८० कोटी रुपये तापी महामंडळास उपलब्ध करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा शब्द देखील जलसंपदामंत्री यांनी यावेळी दिला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव बापू पाटील, पातोंडा येथील प्रभाकर पवार, छोटू पाटील, जितेंद्र येवले, सुखदेव शिंपी, मुरली अहिरे, गजानन माळी, दिलीप पाटील, पांडुरंग आधार माळी, अशोक वाबळे, बी. ओ. पाटील, चितेगाव येथील निवृत्ती अण्णा कवडे, राजेंद्र कवडे, भगवान भोसले, रविंद्र होनसिंग पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content