पेट्रोल टाकून कापूस पेटविला

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील लिहातांडा येथील शेतकऱ्याच्या घरात ठेवलेला १६ हजार रूपये किंमतीचा दोन क्विंटल कापूस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील लिहातांडा येथे राहणारे महादू रूपचंद राठोड (वय-४५) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास विकास लालचंद जाधव आणि एक अनोळखी व्यक्ती दोघे रा. वरखेडीतांडा ता. सोयगाव जि. औरंगाबाद यांनी पेट्रोल टाकून कापूस पेटवून दिला. ही घटना घडल्यानंतर महादू राठोड यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ही आग विझविली. आग लावण्याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. अखेर सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पहूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विकास लालचंद जाधव आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

Protected Content