पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

 

 

पुणे: वृत्तसंस्था । औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यावरून राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक चकमकी झडत असतानाच आता पुण्याच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. पुण्याचं नामांतर ‘जिजापूर’ करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास वेळ लागत असेल तर पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव देऊन या शहराचं नामांतर ‘जिजापूर’ असं करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. जिजाऊंनी बेचिराख झालेलं पुणे शहर बसवलं. पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. पुणे शहर हे माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे नामांतराचं राजकारण करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करायला शिका, असं शिंदे म्हणाले.

यावेळी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीकाही केली. थोरात यांना टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार नाही आणि पचणारही नाही. आमचा वारसा आम्हाला गौरवपूर्ण चालवू द्या, असा चिमटाही त्यांनी काढला.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले होते.

स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंग मध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, औरंगाबादचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” असा डिस्प्ले तयार केला होता.

Protected Content