पालक , शिक्षक धास्तावलेलेच ; शाळा बंद

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकारकडून काही ठराविक राज्यांत २१ सप्टेंबरपासून शाळा महाविद्यालय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी अनेक राज्यांत आजही शाळा-महाविद्यालय सुरू होऊ शकलेली नाहीत.

दिल्लीतही संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अगोदर ३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शाळा उघडण्याचा ही तारीख अनिश्चित काळापर्यंत आणखी पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केलाय.

शिक्षक आणि पालक बैठकांत मिळालेल्या फीडबॅकमध्ये शाळा बंद ठेवण्याचा विचार मांडण्यात आला आहे. त्यामुळे सर्व सरकारी आणि खासगी शाळा पुढच्या आदेशापर्यंत बंदच राहतील असं सिसोदिया यांनी जाहीर केलंय.

जगभरात ज्या ज्या ठिकाणी संक्रमणा दरम्यान शाळा उघडण्यात आल्या आहेत तिथे लहान मुलांमध्ये संक्रमण वाढल्याचं दिसून आलं आहे. अशा वेळी दिल्लीच्या शाळा उघडण्याचा निर्णय योग्य ठरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत दिल्लीत आत्तापर्यंतचे सर्वाधिक ४८५३ कोरोना संक्रमित रुग्ण समोर आले आहेत. दिल्लीत करोनामुळे होणारा मृत्यूदर १.७४ टक्क्यांवर आहे.

केंद्र सरकारकडून ‘अनलॉक’च्या प्रयत्नात सुरूवातीला केवळ ५० टक्के शिक्षक आणि कर्मचारीवर्गासहीत शाळा उघडण्याची परवानगी दिली होती. सोबतच सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर अशा उपायांचा अनिवार्य वापर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Protected Content