पाडळसरे धरणासाठी अमळनेरकर पुन्हा रस्त्यावर उतरणार !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचे काम गतिमानतेने व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाडळसे धरणाचा समावेश करावा यासाठी अमळनेरच्या हजारो विद्यार्थी,नागरिक यांनी लिहिलेले ५१००० विक्रमी पोस्ट कार्ड ९ फेब्रुवारी २०२३ ला भव्य मिरवणुकीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या नावे पोस्टात टाकण्याचे अभिनव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रबुद्ध विहार येथे संपंन झालेल्या पत्रकार परिषदेत पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने देण्यात आली.

 

एखाद्या सार्वजनिक हिताच्या प्रश्नासाठी देशात एवढ्यामोठ्या संख्येने पोस्ट कार्ड लिहिण्याचा विक्रम अमळनेरकरांच्या नावे नोंदला जाईल. पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने २३ वर्षांपासून प्रलंबित असलेले पाडळसे धरण निधीअभावी रखडले आहे. धरण गतिमानतेने पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने समिती आंदोलने करीत आहेत.मात्र वर्षानुवर्ष धरणाची किंमत हजारो कोटींच्या घरात पोहचली आहे या प्रकल्पाला आता केवळ केंद्र सरकारच्या योजनेतूनच आवश्यक असा अपेक्षित निधी मिळू शकतो. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्र देवून सातत्याने पाठपुरावा सुरू असूनही योग्य ती कार्यवाही होत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाभक्षेत्रातील जनतेकडून पोस्ट कार्ड लिहून घेण्याचे आंदोलन मागिल ४ महिन्यांपासून सुरू केले असे पत्रकार परिषदेत पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी , रणजित शिंदे यांनी सांगितले.

 

सदर पत्रलेखन आंदोलनात हजारो विद्यार्थी, पालकांनी, विविध संघटना व नागरिकांनी उत्स्फर्तपणे सहभाग घेवून पाडळसे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश व्हावा अन्यथा लाभक्षेत्रातील जनता येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकेल! असा इशारा हि या पत्राद्वारे मुख्यमंत्री यांना स्व:हस्ताक्षरात ५१ हजारापेक्षा जास्त पोस्ट कार्ड लिहून जनआंदोलन समितीला सुपूर्द केले आहेत. विशेषतः यात काही नागरिकांनी स्व:ताच्या रक्ताने हि पत्र लिहिलेले आहेत.हि सर्व पोस्टकार्ड भव्य मिरणूकिने पोस्टपेटीत टाकण्यात येतील. सदर मिरवणुकीत पोस्टकार्ड लिहिणारे, विद्यार्थी, पालक, विविध सामाजिक संघटना व युनियन यांचेसह विविध राजकीय पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन पत्र देण्यात आले आहे.

 

सदरची पोस्टकार्ड लिहिण्यासाठी पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमळनेर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विविध संस्था, संघटना यांचेकडे जावून सदर विषयाचे गांभीर्य पटवून देत जनजागृती केली प्रत्येक नागरिकास या आंदोलनात सहभागी होता यावे यासाठी सदर पोस्ट कार्ड आंदोलन उभारण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, रणजित शिंदे यांनी संबोधित केले. याप्रसंगी जनआंदोलन समितीचे हेमंत भांडारकर, रामराव पवार, महेश पाटील, प्रताप साळी, हिरामण कंखरे, सुनिल पाटील, राजू देसले, नारायण बडगुजर, देविदास देसले,आर.बी. पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content