नवी दिल्ली : वृत्तसंस्था । परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्याना अवघड प्रश्न आधी सोडवण्याच्या दिलेल्या सल्ल्याची समाजमाध्यमावर विरोधी पक्ष व इतरांनी खिल्ली उडवल्यानंतर मोदी यांचे ट्विट संदेश प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोने काढून टाकले आहेत.
शालान्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याशी पंतप्रधान दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात संवाद साधत असतात. या वेळी त्यांनी आभासी पातळीवर हा कार्यक्रम घेतला. मोदी यांच्या या संवादाची चित्रफीत प्रसारित करण्यात आली असून त्यात त्यांनी अवघड प्रश्न आधी सोडवून त्याला जास्त वेळ देण्याचे स्पष्ट म्हटले आहे. सुरूवातीला मन ताजेतवाने असते, त्यामुळे तुम्ही अवघड प्रश्न प्रथम सोडवा. नंतर सोप्या प्रश्नांची उत्तरे लिहा असे त्यांनी म्हटले होते.
नेहमी परीक्षेत शिक्षक व पालक ‘सोपे प्रश्न आधी सोडवा तर अवघड नंतर सोडवा’ असे सांगत असतात पण मोदी यांनी नेमका उलटा सल्ला दिला, अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावर उमटली.
मोदी यांनी सांगितले, की आपण पंतप्रधान म्हणून आधी अवघड विषयांना हात घातला. मी सकाळी उठतो तेव्हा कठीण गोष्टींचा सामना करण्यासाठी सदैव तयार असतो. असे ते म्हणाले होते