नायगावात परप्रांतीयांना घरकुलांचा लाभ ; ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

 

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील नायगावच्या ग्रामसेवकाकडून ‘अर्थ’पूर्ण व्यवहारातून परप्रांतीयांना  बेकायदेशीरपणे  घरकुलांचा लाभ दिला जात असल्याची तक्रार जि प मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे करण्यात आली आहे  

 

तालुक्यातील नायगाव येथील ग्रामसेवक सरपंचांना हाताशी धरून संगनमताने मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार उपसरपंचासह सहा सदस्यांनी जिल्हा परिषद सिईओकडे केलेली आहे

 

ग्रामपंचायत कार्यालयाचे कुठलेही काम करताना आम्हाला विश्वासात घेत नाही, मनमानी करून सर्व निर्णय  स्वतः घेतात, मासिक सभेला सुद्धा हजर राहात नाही व नंतर येऊन सर्व विषय त्यांच्या मर्जीनुसार प्रोसिडिंगवर नमूद करतात, मासिक सभेमध्ये मागील विषय घेत नाही, त्यामुळे यात काहीतरी घोटाळा आहे असे स्पष्ट होते, याबाबत विचारणा केली असतां संबंधितांकडून अरेरावीची उत्तरे मिळतात. अशा प्रकारची लेखी तक्रार करण्यात आलेली आहे.

 

तक्रारदारांनी ग्रामसेवक व सरपंचांच्या कारभाराविषयी अनेकदा वरीष्ठांकडे लेखी तक्रार अर्ज करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही ग्रामसेवकांवर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न नायगावकर ग्रामस्थांकडुन उपस्थित केला जात आहे.

ग्रामपंचायत कार्यालयाच्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती विचारली असता, ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांचेकडून स्पष्ट नकार मिळतो. प्रत्येक प्रश्न हा लेखी अर्ज करूनच विचारावा असे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. मासिक सभेमध्ये झालेल्या खर्चाची बिले मागणी करूनही अवलोकनासाठी सभेपुढे ठेवत नाही. ग्रामपंचायतीचा कर- वसुली भरणा बँकेत केला जात नसून तो परस्पर खर्च केला जातो. त्यानुसार आम्ही सभेच्या अजेंड्यावर जमा-खर्च नमूद करण्याची मागणी केलेली आहे. ती सुद्धा मागणी अमलात आलेली नाही विविध विषयांची योग्य माहिती मिळत नाही. कामापेक्षा जास्तीचा खर्च दाखवून बाकी रक्कम गहाळ केली जात आहे. ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे हे मासिक सभेला गैरहजर राहूनही दडपशाहीने कारभार करतात या गैरकारभाररास त्वरित आळा बसावा व ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी  मागणी  उपसरपंच सौ सोनल रामदास पाटील यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे.३१ मेरोजी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद (जळगाव) यांच्याकडे देण्यात आलेले आहे.

ग्रामपंचायतीच्या गैरकारभारविषयी पदाधिकाऱ्यांनी २९ जूनरोजी तहसीलदार (यावल) यांच्याकडेसुद्धा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे या तक्रार अर्जात म्हटल्यानुसार ग्रामपंचायतीच्या मालकीची शेती  गट क्रं.२६९ अशी मालमत्ता आहे  शेताच्या बांधावर ७० ते ८० झाडे होती ग्रामपंचायतमध्ये ठराव घेतांना फक्त सदर झाडांच्या फांद्यांची छाटणी करायचे असे ठरले होते मात्र प्रत्यक्षात सरपंच व ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांनी संगनमत करून  सर्व झाडे कुठलीही परवानगी न घेता तोडून टाकली आहे.

गटविकास अधिकाऱ्यांना तब्बल तीन तक्रार अर्ज दिलेले आहे  मध्य प्रदेशातील परप्रांतीय रहिवासी असलेल्या आदिवासी बारेला कुटुंबियांच्या नावे घरकुल योजनेअंतर्गत काही घरकुल मंजूर करुन बांधकाम सुरू आहे बारेला कुटुंब यांचे गावाच्या मतदार यादीतसुद्धा नाव नाही व त्यांचा रहीवासही नाही अशा लोकांना घरकुल मंजूर करून गावातील पात्र लोकांना सरपंच व ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांनी घरकुल योजनेपासून वंचित ठेवलेले आहे.गावालगत निमछाव नावाची आदिवासी वस्ती उदयास आलेली असून या ठिकाणी बोगस घरकुलांचे सर्रास बांधकाम सुरू आहे पैशांची मोठ्या प्रमाणात देवाण- घेवाण झालेली असून एका घरकुलामागे २५ ते ३० हजार रुपयांची वसुली या बोगस लाभार्थ्यांकडुन करण्यात आल्याची चर्चा आहे  वरिष्ठांनी सखोल चौकशी करावी अशी २३ जूनरोजीच्या  निवेदनात मागणी केलेली आहे.

 

ग्रामसेवक पी.डी. सैंदाणे व सरपंच यांच्या गैरकारभाराविरुद्ध  उपसरपंच सौ सोनल पाटील  तसेच उत्तम सपकाळे, ज्योती देशमुख, रमाबाई कोळी, राजू तडवी, महेंद्र तडवी, अलिशानबाई तडवी या सहा ग्रामपंचायत सदस्यांच्या लेखी तक्रारीवरून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील व तर अधिकार्‍यांच्या पथकाने चौकशीसाठी भेट देऊन  चौकशी केली मात्र चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही

ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे हे मासिक सभेला गैरहजर राहतात. ते आपल्या गैरहजेरीत शिपाई यांना मासिक सभा घेण्यासंदर्भात सांगून जातात त्यानुसार मासिक सभा शिपाई घेत असतात अशा या कारभाराकडून गावाच्या कुठल्या  विकासाची अपेक्षा करावी ? असा प्रश्न आहे. ग्रामसेवक व सरपंच यांचे अनेक गैरव्यवहार आम्ही लेखी निवेदनाद्वारे वरिष्ठ प्रशासनाकडे कळविले आहे मात्र अद्याप यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही कुठलीही नि:पक्षपातीपणे कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हा परिषदसमोर आमरण उपोषण करू असे  उपसरपंच सौ सोनल   पाटील यांनी सांगितले आहे.

 

Protected Content