नव्या कृषी कायद्यांना विरोधाची विधेयके राष्ट्रपतींकडे पाठवा

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्राच्या कृषी विधेयकाविरोधात पंजाब विधानसभेत संमत करण्यात आलेली कृषी विधेयके अद्यापही राज्यपाल व्ही पी सिंह बडनोर यांच्याकडेच आहेत, त्यांनी ती राष्ट्रपतींकडे पाठवलेली नाहीत, ती मंजूर करावीत म्हणून आज मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील जंतर मंतर भागात धरणं आंदोलन केलं.

संसदेत संमत करण्यात आलेल्या तीन कृषी विधेयकांविरोधात पंजाब विधानसभेनं तीन कृषी विधेयके संमत केल्यानंतर केंद्राकडून पंजाबची चहूबाजुंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय.

कृषी विधेयकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, मंगळवारी राष्ट्रपतींनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिली नाही. त्यानंतर अमरिंदर सिंह यांनी बुधवारी जंतर मंतरवर धरणं आंदोलन केलं.

‘कृषी हा राज्याचा विषय आहे. आम्ही आमच्या अधिकारांचा वापर करत नवीन कृषी कायदे बनवले. परंतु, ही विधेयके अद्याप राज्यपालांकडे पडून आहेत. आम्ही २० ऑक्टोबर रोजी त्यांच्याकडे ही विधेयके सोपवली होती परंतु, त्यांनी ती अद्याप राष्ट्रपतींकडे पाठवलेली नाहीत. त्यामुळे राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना पंजाबच्या स्थितीविषयी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. राष्ट्रपती या विधेयकांना मंजुरी देतील, अशी आशा करतो’ असं आंदोलनावेळी अमरिंदर सिंह यांनी म्हटलं.

 

‘आम्हाला कोणताही वाद नकोय. पंजाबमध्ये शांतिपूर्ण पद्धतीनं आंदोलन सुरू आहे. पंजाबची लोकसंक्या तीन कोटींहून अधिक आहे. पंजाबमधून एफसीआयला ४० टक्के धान्य पुरवलं जातं. हरितक्रांती अगोदरपासून आमच्याकडे आडती पद्धत सुरू आहे. ही पद्धत का संपवली जात आहे. कॉर्पोरेट हाऊसकडे शेतकरी आपल्या गरजेच्या वेळी पैसे मागू शकणार नाहीत’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

‘शेतकरी आंदोलन सुरू झालं तेव्हा आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, दोन गोष्टींना कधीही छेडू नका… एक म्हणजे धर्म आणि दुसरा म्हणजे पोटापाण्याचा प्रश्न… पंजाब हे एक सीमेवरचं राज्य आहे. दररोज पाकिस्तानकडून येणारे ड्रोन छेडछाडीचा प्रयत्न करतात. आम्ही केंद्र सरकारच्या एजन्सीसोबत काम करत आहोत.

आम्हाला वाद नकोय. परंतु, आमच्याकडे रेल्वे बंद करण्यात आलेल्या आहेत. शेतकरी केवळ दोन मुख्य रस्त्यांवर आंदोलन करत आहेत, इतर ठिकाणी रेल्वे चालवणं सहजशक्य आहे. मी रेल्वेमंत्र्यांना रेल्वे चालवण्याची विनंती करत याची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली. परंतु, रेल्वे काही सुरू झाल्या नाहीत’ असं म्हणत पंजाबची कोंडी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

‘आमच्याकडे पॉवर प्लान्टमध्ये कोळसा संपत आलाय. वीजेची समस्या उभी राहिलीय. राज्यात रेल्वे येणार नाही तर कोळसाही येणार नाही. बियाणांची आणि खतांची कमतरता राज्यात जाणवतेय. यंदा चांगली पिकं झाल्यानं रेल्वेची आवश्यकता आहे. आमची गोदामं धान्यानं भरलेली आहेत’ असं म्हणत अमरिंदर सिंह यांनी राज्यासमोर उभ्या राहिलेल्या संकटांवर तोडगा काढण्याची केंद्राकडे विनंती केलीय.

काँग्रेसकडून हे आंदोलन अगोदर महात्मा गांधीजींच्या समाधी स्थळाजवळ करण्यात येणार होतं. परंतु, कलम १४४ लावण्यात आल्यामुळे हे आंदोलन जंतर मंतरवर करण्यात आलं.

Protected Content