चीनची खुमखुमी : अरुणाचलजवळ वसवली तीन गावं

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पूर्व लडाखमध्ये तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनकडून वास्तविक नियंत्रण रेषेजवळील कारवाया सुरूच आहेत. चीनने पश्चिम अरुणाचल प्रदेशमध्ये भारत, चीन आणि भूतानच्या सीमेजवळ तीन गावं वसवली आहेत. याची छायाचित्रे उपग्रहाने टिपली आहेत.

ज्या ठिकाणी चीनने ही तीन गावं वसवली आहेत, तो भाग बमलापासून सुमारे ५ किमी दूर आहे. ही माहिती उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांवरुन प्राप्त झाली आहे. चीनचं हे पाऊल दोन्ही देशांदरम्यान या क्षेत्रातील सीमावादाला अधिक गुंतागुंतीचं बनवू शकतो. चीनने या भागात केलेलं नवं बांधकाम हे अरुणाचल प्रदेशलगतच्या भागावर आपला दावा मजबूत करण्याच्या चीनच्या अजेंड्याचा भाग आहे.

रणनीती तज्ज्ञ ब्रह्म चेलानी यांचं म्हणणं आहे की, “चीन भारताच्या सीमेलगतच्या भागात हान चीनी आणि तिबेटमधील कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांची वस्ती निर्माण करुन आपला क्षेत्रीय दावा मजबूत करण्याच्या धोरणावर काम करत आहे. सीमवेर घुसखोरी वाढवण्याचाही चीनचा उद्देश आहे.

भूतानच्या ताब्यातील भागामध्ये चीनने यापूर्वी काही गावं वसवली होती. भूतानमधील हा भाग २०१७ मध्ये भारत-चीनमधील डोकलाममध्ये झालेल्या संघर्षाच्या ठिकाणापासून केवळ ६ किमी दूर होता. ही गावं चीनच्या हद्दीत होती जेव्हा भारत-चीनचं सैन्य पूर्व लडाखमध्ये एकमेकांसमोर उभं ठाकलं होतं.

Protected Content