गोविंदा पथक समन्वय समितीचाच राम कदमांना झटका !

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुख्यमंत्र्यांनी, “कोरोनालाही आंदोलन करुन घालवा ना”, असं राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांना सांगितल होत मुख्यमंत्र्याचं हे वक्तव्य राम कदम यांनाही लागू होतं, असं म्हणत गोविंदा पथक समन्वय समितीने राम कदमांनाच झटका दिला आहे.

 

महाविकास आघाडी सरकारने सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. आज दहीहंडी मंडळं, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत घेतलेल्या बैठकीनंतर दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. या बैठकीमध्ये समन्वय समितीने आपली मांडली आणि त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच टास्क फोर्सने या आयोजनाचे काय परिणाम होतील हे सविस्तर सांगितल्यानंतर समन्वय समितीला राज्य सरकारची भूमिका पटल्याने त्यांनी हा निर्णय स्वीकारल्याचं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. मात्र ही बैठक सुरु असतानाच भाजपाचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करुन काहीही झालं तर हिंदू दहीहंडी साजरी करणारच असं आव्हान राज्य सरकारला दिलं  याचसंदर्भात समन्वय समितीला बैठकीनंतर प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत राम कदमांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

 

दुपारी बारा ते सव्वा दोनपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सन्मवय समितीची बैठक सुरु होती. याच दरम्यान राम कदम यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत काहीही झालं तर दहीहंडी साजरी करणार अशी भूमिका घेतली. “काही गोविंदा पथकं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत. सर्व गोविंदा पथकांची इच्छा आहे की यंदा गोविंदा उत्सव जोमात, धुमधडाक्यात साजरा करता यावा. यावेळेची दहीहंडी या महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही,” असं राम कदम या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. “आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. हा हिंदूंचा उत्सव आहे. जेव्हा हिंदूंचे उत्सव येतात तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले. मात्र इतरांचे उत्सव येतात तेव्हा त्यांना परवानगी दिली जाते, हा दुटप्पी न्याय कसा?” असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केलाय. “बियर बार, दारुचे ठेले सुरु करता. त्यांच्यासाठी नियम बनवता. तसे नियम बनवणार असाल तर त्या नियमांचं स्वागत करु, नियमांचं पालन करु. पण तुम्ही नियम बनवणार नसाल आणि एअर कंडिशन बंगल्यामधून सांगणार असाल की दहीहंडी साजरी करायची नाही तर हिंदू बांधव ऐकणार नाही. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच,” असं राम कदम म्हणाले

 

राम कदम यांच्या या विरोधी भूमिकेसंदर्भात समन्वय समितीने बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना समितीच्या अधिकाऱ्यांनी, आम्ही निर्णय घेतल्यानंतर काही लोक आंदोलन करतात, विरोधी भूमिका घेतात असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितल्याचं नमूद केलं. मुख्यमंत्र्यांनी, “कोरोनालाही आंदोलन करुन घालवा ना”, असं या विरोध करणाऱ्यांना सांगितल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्याचं हे वक्तव्य राम कदम यांनाही लागू होतं, असं समन्वय समितीने म्हटलं आहे.

 

एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं समिती सदस्य म्हणाले. यंत्रणांवरील ताण वैगेरे पाहता मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आवाहन केलं आहे. परवानगी नसल्याने आम्ही दहीहंडीचं आयोजन न करण्याची भूमिका घेणार आहोत, असं समन्वय समितीने सांगितलं आहे.

Protected Content