कोरोना रुग्ण बरे होण्याच्या वेगात भारत जगात पहिला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था / सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आला असून, ब्राझीलपेक्षा भारतात बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या सोमवार सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतात ३७ लाख ८० हजार १०७ बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

या आकडेवारीनुसार जगभरात १ कोटी ९६ लाख २५ हजार ९५९ लोक बरे झाले आहेत, जगातील बाधितांची संख्या २ कोटी ९० लाख ६ हजार ३३ इतकी झाली आहे. जगभरात ९ लाख २४ हजार १०५ मृत्यू झाले आहेत. जॉन हॉपकिन्स विद्यापीठ कोव्हिड-१९ आजाराशी संबंधित जगभरातील माहिती एकत्र करीत असते. या विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये ३७ लाख २३ हजार २०६ जण बरे झाले आहेत. अमेरिकेत २४ लाख ५१ हजार ४०६ रुग्ण बरे झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर ७८ टक्के आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यांच्यातील फरक सातत्याने कमी होत आहे,’ देशातील बरे झालेल्या रुग्णांपैकी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तसेच तमिळनाडू या राज्यांतील रुग्ण ६० टक्के आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ९ लाख ८६ हजार ५९८ असून, देशातील बाधितांची एकूण संख्या ४८ लाख ४६ हजार ४२७ इतकी झाली आहे.

ब्रिटनमध्ये सोमवारपासून ‘रुल ऑफ सिक्स’ लागू झाला असून, या नियमानुसार सहापेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. सहापेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास त्यांना शंभर पौंड दंड करण्यात येणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गेल्या आठवड्यात हा नियम जाहीर केला होता.
इटलीमध्ये कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कोडोग्नो येथे सात महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. कोडोग्नोतील नर्सरी शाळांमध्ये मुलांच्या शरीराचे तापमान नोंदवले जाणार आहे. मात्र, या बालकांना मास्क वापरण्याची गरज नसेल. एलिमेंटरी शाळा आणि माध्यमिक शाळांतील मुलांच्या पालकांनी पाल्याचे घरी तापमान मोजण्याच्या सूचना असून, या विद्यार्थ्यांना शाळेत मास्क परिधान करावा लागणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये दोन आठवड्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाढत्या संसर्गामुळे इंडोनेशियातील रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरली आहेत. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असून, मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. जकार्तामध्ये यापूर्वी एप्रिल ते जून या कालावधीत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले होते.

Protected Content